एअर इंडियाची आर्थिक गाडी कोसळली, 35 टक्के बुकिंग घटले

एकेकाळी ’महाराजा’च्या रुबाबात आकाशात स्वतःचा दबदबा राखलेल्या एअर इंडियाची आर्थिक गाडी पूर्णपणे कोसळली आहे. कंपनीच्या विमान उड्डाणांचे बुकिंग तब्बल 35 टक्क्यांनी घटले आहे. अहमदाबादमध्ये ‘बोईंग ड्रिमलायनर’ विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर एअर इंडियाचे दिवस फिरले आहेत. सुरक्षेच्या भीतीपोटी प्रवाशांनी एअर इंडियाकडे पाठ फिरवल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.

12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि त्यात 279 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्या अपघातानंतरही एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच राहिले आहे. काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे इमर्जन्सी लॅण्डिंग करावे लागले. त्यामुळे प्रवाशांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. विमान अपघाताची बातमी कळल्यानंतर बहुसंख्य प्रवाशांनी त्यांचे बुकिंग तातडीने रद्द केले. ट्रॅव्हल एजन्सींच्या अहवालानुसार, 12 जूनपासून एअर इंडियाच्या 20 टक्क्यांहून अधिक बुकिंग रद्द करण्यात आल्या. अनेक प्रवाशांनी त्यांचे तिकीटाचे पैसे परत मिळतील की नाही, याची चिंता न करता आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिटे रद्द केली आहेत. त्यामुळे एअर इंडियाची आर्थिक गाडी अक्षरशः कोसळल्याची स्थिती आहे.

दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानाला पक्ष्याची धडक

शुक्रवारी सकाळी दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेत असताना पक्ष्याची धडक बसली. सुरक्षेच्या कारणास्तव त्या विमानाचे पुणे विमानतळावर तातडीने लॅण्डिंग करण्यात आले. प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. त्यात इंजिनचे नुकसान झाल्याचे लक्षात आल्यानंतर विमानाचा दिल्लीचा परतीचा प्रवास रद्द करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

स्वस्त तिकीट देऊनही प्रवाशांनी फिरवली पाठ

अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाने आपल्या उड्डाणांचा तिकीट दर कमी केला. मात्र अपघाताचे भयंकर चित्र पाहिलेल्या प्रवाशांना एअर इंडियाचे स्वस्त तिकीटही नकोसे झाले आहे. मुंबई-दिल्ली प्रवासासाठी एअर इंडियाचे तिकीट 5,716 रुपयांत उपलब्ध होत आहे. त्याच प्रवासासाठी स्पाइसजेटच्या तिकीटाची किंमत 7,602 रुपये आहे. इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त तिकिटी मिळूनही प्रवासी एअर इंडियाकडे पाठ फिरवत आहेत.

शुक्रवारी एकाच दिवशी आणखी आठ उड्डाणे रद्द

एअर इंडियाच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र शुक्रवारीही सुरुच राहिले. त्यामुळे एकाच दिवशी 8 उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की एअर इंडियावर ओढवली. त्यात 4 आंतरराष्ट्रीय, तर 4 देशांतर्गत उड्डाणांचा समावेश होता. देखभाल व ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणे रद्द केल्याचे कंपनीने स्पष्ट केले. अहमदाबाद विमान अपघातानंतर विविध कारणांमुळे 9 दिवसांत एअर इंडियाची 84 उड्डाणे रद्द करण्यात आली.