
सरकारवर आधी 9 लाख 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते ते आता 10 लाख कोटी रुपयांवर कर्ज झाले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर उत्तर देण्याऐवजी सभागृहात बाहेरील मुद्दे सत्ताधाऱयांनी मांडून लोकांच्या प्रश्नांपासून पळ काढला आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
महायुती सरकार हे जनताविरोधी असल्याचा टीका दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. बोगस बियांचे मोठे प्रकार घडले असताना त्याबाबत कोणताही कायदा आणलेला नाही. या अधिवेशनात बऱयाच मंत्र्यांनी टाईमपास केला आहे. जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या विरोधातील हे सरकार कार्यभार चालवण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही दानवे यांनी केला. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून मुंबईचे गिरणी कामगार, शिक्षकांचे प्रश्न, कायदा-सुव्यवस्था भ्रष्टाचार, शालार्थ आयडी घोटाळा आदी मुद्दय़ांवर सभागृहात आवाज उठवला. शक्तिपीठ महामार्ग, हिंदी सक्ती, मेघा इंजिनीअरिंगचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला, मात्र सरकारने खुलासा केला नसल्याबाबत दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शासनाची मानसिकता देवाची की दानवाची? सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला संतप्त सवाल