हॉटेल लिलावावर प्रतिक्रिया देताना असंसदीय भाषेचा वापर, मंत्री शिरसाटांवर शिस्तभंगाची कारवाई करा; अंबादास दानवेंची मागणी

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 2 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील वादावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिकरीत्या अत्यंत असंसदीय, असंविधानिक आणि सभ्यतेला धरून नसलेले वक्तव्य केले. यासाठी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे. याबाबत त्यांनी स्वतः x वर एक पोस्ट करून माहिती दिली आहे.

x वर केलेल्या पोस्टमध्ये अंबादास दानवे म्हणाले की, “संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीरता लक्षात घेऊन मंत्रीपदाच्या शुचितेचा, सभ्यतेचा व लोकशाही मूल्यांचा उचित सन्मान राखला जाण्याच्या दृष्टीने योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी मी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.”

संजय शिरसाट यांनी काय केलं होतं वक्तव्य?

राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात अंबादास दानवे म्हणाले आहेत की, “राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 2 जून 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील ‘विट्स’ हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतील वादावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिकरीत्या अत्यंत असंसदीय, असंविधानिक आणि सभ्यतेला धरून नसलेले वक्तव्य केले आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीरपणे माध्यमांसमोर म्हटले आहे की, “मी वेडा माणूस आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही.” अशा स्वरूपाचे वक्तव्य सामाजिक न्याय मंत्री या पदाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे असून, लोकशाही व्यवस्थेत मंत्रिमंडळातील सदस्यांकडून अपेक्षित असलेल्या जबाबदारी आणि संयमाचा प्रत्यक्ष उल्लंघन करणारे आहे. सामाजिक न्याय मंत्री म्हणून पद भूषवताना त्यांनी केलेले हे वक्तव्य केवळ व्यक्तिशः आक्षेपार्ह नसून, शासनाच्या सार्वजनिक मर्यादा व जबाबदाऱ्या यांच्याशी विसंगत आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात द्वेष व वितुष्ट पसरण्याची शक्यता असून, लोकशाही मूल्यांचा अवमान झालेला आहे.”

त्यांनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, “संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीरता लक्षात घेता, मंत्रीपदाच्या शुचितेचा, सभ्यतेचा व लोकशाही मूल्यांचा उचित सन्मान राखला जाण्याच्या दृष्टीने योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी मी या पत्राद्वारे आपणाकडे करीत आहे.”