जागर – वटवाघळे चक्क देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भावेश ब्राह्मणकर

हेडिंग वाचूनही तुमचा विश्वास बसत नाहीय ना! पण हे खरे आहे. सर्वसाधारणपणे अशुभ मानली जाणारी वटवाघळे ही पर्यावरण आणि देशासाठी अतिशय महत्त्वाची असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे.

जगभरात वटवाघळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच संशयास्पद राहिला आहे. कधी अंधारलेल्या गुहांचे रहिवासी, कधी अशुभ मानले जाणारे निशाचर, तर अलीकडच्या काळात ‘इबोला’ आणि ‘कोविड-19’सारख्या जागतिक महामारीचे उगमस्थान म्हणून त्यांच्यावर ठपका ठेवला गेला. ऑस्ट्रेलियात तर एकेकाळी या निष्पाप प्राण्यांना ‘उपद्रवी’ ठरवून त्यांच्या वसाहती नष्ट करण्यासाठी चक्क ‘नापाम’सारख्या दाहक अस्त्रांचा वापर करण्यात आला होता. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधाने या ‘उडणाऱया कोह्यांच्या’बाबतीत जगाचे डोळे उघडले आहेत. वटवाघळे केवळ रोग पसरवणारे जीव नसून ती देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि पर्यावरणाचे मूक आधारस्तंभ आहेत, हे आता विज्ञानाने सिद्ध केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर आढळणारा ‘ग्रे-हेडेड फ्लाइंग फॉक्स’ हे जगातील सर्वात मोठय़ा वटवाघळांपैकी एक आहेत. दोन पाऊंड वजन आणि पाच फुटांहून अधिक पंखांचा विस्तार असलेला हा प्राणी जेव्हा आकाशातून संथपणे उडतो तेव्हा तो केवळ स्थलांतर करत नसतो, तर तो एका मोठय़ा वनीकरण मोहिमेवर असतो. वटवाघळांचे तज्ञ या प्रक्रियेला ‘सीड रेन’ किंवा ‘बियाण्यांचा वर्षाव’ असे म्हणतात. हे प्राणी उडतानाच विष्ठा त्यागतात. या विष्ठेमध्ये त्यांनी खाल्लेल्या फळांच्या बिया असतात, ज्या थेट जमिनीवर पडतात आणि पावसाळ्यात रुजतात.

वटवाघळांच्या विष्ठेला आपण घाण समजतो. मात्र प्रत्यक्षात एका अवाढव्य जंगलाची निर्मिती करणारे ते ‘खत’ असते. ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, या फ्लाइंग फॉक्सनी आजवर तब्बल 9 कोटी 10 लाखांहून अधिक झाडे लावली आहेत. यात प्रामुख्याने निलगिरीसारख्या वृक्षांचा समावेश आहे, जे ऑस्ट्रेलियन लाकूड उद्योगाचा कणा मानले जातात. कोणत्याही प्राण्याचे आर्थिक मूल्य मोजणे कठीण असते, परंतु युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि सीएसआयआरओच्या संशोधकांनी हे आव्हान पेलले. त्यांनी 1,200 हून अधिक वसाहतींच्या डेटाचा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला की, हे वटवाघूळ दरवर्षी ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेत 195 दशलक्ष ते 673 दशलक्ष डॉलर्सचे योगदान देतात.

संशोधकांनी या प्रभावाला ‘बॅट रिपल इफेक्ट’ असे नाव दिले आहे. ज्याप्रमाणे शांत पाण्यात दगड टाकल्यावर लहरी उमटत जातात, त्याचप्रमाणे हे वटवाघूळ जेव्हा काही दिवसांत शेकडो मैलांचा प्रवास करतात तेव्हा ते एका परिसंस्थेला दुसऱया परिसंस्थेशी जोडतात. मधमाश्या किंवा पक्षी ठरावीक अंतरापर्यंतच परागीकरण करू शकतात, परंतु फ्लाइंग फॉक्स हे लांब पल्ल्याचे ‘मेगा-डिस्पर्सर्स’ आहेत. ते केवळ दूरवर जात नाहीत तर मोठय़ा आकाराच्या बियादेखील वाहून नेण्याची क्षमता ठेवतात. सिडनी विद्यापीठातील संशोधक अल्फ्रेडो ऑर्टेगा गोन्झालेझ यांनी ‘सह-उक्रांती’ या संकल्पनेवर भर दिला आहे. त्यांच्या मते, काही झाडे आणि वटवाघळे एकमेकांसाठीच बनले आहेत.

आज हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे ऑस्ट्रेलियातील वणव्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा वेळी या भग्न झालेल्या जंगलांना पुन्हा जिवंत करण्यासाठी ‘फ्लाइंग फॉक्स’ महत्त्वाचे ठरत आहेत. एका जंगलातील आनुवांशिक माहिती दुसऱया जंगलापर्यंत पोहोचवण्याचे काम हे प्राणी करतात. थोडक्यात सांगायचे तर विखुरलेल्या जंगलांना सांधणारा हा निसर्गाचा ‘डिंक’ आहे, परंतु हे रक्षक स्वतच आता संकटात आहेत. अतिउष्णतेच्या एका लाटेत हजारो वटवाघळे मृत्युमुखी पडतात. हवामान बदलाचा हा तडाखा या नैसर्गिक इंजिनीअर्सना कमकुवत करत आहे.

अल्फ्रेडो ऑर्टेगा गोन्झालेझ यांच्या मते, जर वटवाघळे नष्ट झाली तर त्याचा परिणाम उद्या सकाळी लगेच दिसणार नाही. तो संथ असेल. वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीतील प्राणी पर्यावरणशास्त्र प्राध्यापक डॉ. जस्टिन वेलबर्गेन यांच्या मते, वटवाघळे ही ऑस्ट्रेलियाच्या विखुरलेल्या निसर्गाला जोडून ठेवणारा ‘डिंक’ आहेत. ते दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा दोन्ही टोकाच्या परिस्थितीत टिकून राहतात. त्यांच्या प्रचंड गतिशीलतेमुळे ते विखुरलेल्या जंगलांमधील आनुवंशिक साखळी टिकवून ठेवतात. तर संवर्धन तज्ञ आणि अभ्यासक अलेक्झांडर ब्राझकोव्स्की यांनी वटवाघळांच्या कार्यक्षमतेची तुलना इतर परागीकरण करणाऱया जिवांशी केली आहे. जेव्हा आपण फ्लाइंग फॉक्सची तुलना पक्षी किंवा मधमाश्यांशी करतो तेव्हा लक्षात येते की, वटवाघळे सरासरीने कितीतरी जास्त अंतर पार करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते मोठय़ा आकाराच्या बिया हाताळू शकतात, जे इतर लहान जिवांना शक्य नसते. त्यामुळेच मोठय़ा वृक्षांच्या पुनरुत्पादनात त्यांची भूमिका ‘किंगमेकर’ ठरते, असे ते म्हणतात.

भारतातही वटवाघळांबाबत अनेक गैरसमज आहेत. मात्र, मेक्सिकोमधील टकीला उद्योग असो वा टेक्सासमधील कापसाची शेती, वटवाघळांशिवाय यातील कशाचीही कल्पना करता येणार नाही. ते कीड नियंत्रण करतात, परागीकरण करतात आणि आता सिद्ध झाल्याप्रमाणे अब्जावधींच्या लाकूड उद्योगाला जिवंत ठेवतात. आपल्याला वटवाघळांना भीतिदायक आणि हिडीस मानायला शिकवले गेले, पण विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, ज्या प्राण्यांचा आपण तिरस्कार करतो तेच प्रत्यक्षात आपल्या जगण्याचा आधार आहेत. निसर्गाच्या या ‘नभचारी’ रक्षकांना वाचवणे हे केवळ प्राणिप्रेम नसून आपल्या स्वतच्या आर्थिक आणि पर्यावरणीय भविष्याची गुंतवणूक आहे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार आहेत) [email protected]