
>> विजय पांढरीपांडे
गेल्या एकदोन वर्षांत ज्या बजवर्डने सर्वाधिक धुमाकूळ घातलाय तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. हे वादळ खरे तर काही दशकांपूर्वीच सुरू झाले. इंटरनेट,सोशल मीडिया,संगणकाची अन् बिनतारी संदेशवहनाची वाढती व्याप्ती अशा विविध पायऱया चढत हे वादळ आधीच सुरू झाले होते, पण ते कसे, कोणते रूप धारण करेल याचा अंदाज आपल्याला आला नव्हता. अनेक क्रांतिकारक बदल असेच परिणामाविषयी संभ्रम निर्माण करणारे असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकरण याच पॅटेगरीत मोडते.
या बदलाचा विचार करताना कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान अन् यापूर्वीचे तंत्रज्ञान यातला मूलभूत महत्त्वाचा फरक समजून घेतला पाहिजे. यापूर्वीचे संपूर्ण शोध, तंत्रज्ञान हे माणसाच्या हातातील बाहुले होते. रेल्वे,जहाज,विमान या सर्वांचे स्टीअरिंग माणसाच्या हातात होते. प्रिंटिंग मशीनचा शोध लागला तरी काय छापायचे, हे माणूस ठरवीत होता. अणुबॉम्ब आपण तयार केला, पण तो कुठे टाकायचा हे माणूसच ठरवीत होता. हे नवे एआय प्रकरण मात्र याबाबतीत एकदम वेगळे म्हणून जरा धोकादायक आहे. आधी संगणक आपण सांगू, आज्ञावली देऊ त्याप्रमाणेच वागणार अन् उत्तर देणार. एआयचे मात्र तसे नाही. एआय स्वतः शिकू शकतो, स्वतः स्वतंत्र निर्णय घेऊ शकतो. हे सर्वात जास्त धोकादायक आहे.
माणसाच्या हातातील स्टीअरिंग, निर्णय प्रक्रिया या एआयने स्वतःकडे घेतली आहे. त्याचे निर्णय बऱयाच बाबतीत आपल्यापेक्षा चांगले, अचूक असू शकतात, पण प्रत्यक्ष व्यवहारात निर्णय घेताना माणूस अनेक अंगांनी विचार करतो. एआय नावाप्रमाणेच कृत्रिम, कोरडा, भावनाशून्य, अव्यवहारी असतो. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आता याचा शिक्षणावर म्हणजे अध्ययन अध्यापनावर काय परिणाम होईल, याची चिंता अनेकांना वाटते. विशेष म्हणजे चॅट जीपीटी प्रकरण आल्यापासून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मोबाईल,संगणकावर मिळणार असेल, तुमचे होमवर्क, प्रोजेक्ट, प्रबंध लेखन या सगळ्यात वेगवेगळे अॅप तुमच्या सेवेला असतील तर विद्यार्थी स्वतः स्वतंत्र विचार करणारच नाहीत, त्यांची तार्किक विचार क्षमता वाढणारच नाही ही भीती स्वाभाविक आहे, पण पूर्वी आपल्याला पाढे पाठ होते. आता हे टेबल्स कुणी पाठ करीत नाहीत. कॅल्क्युलेटर आले अन् गणित केव्हाच सोपे झाले. म्हणून फारसा फरक पडला का? पूर्वी हातांनी वहीत लिहिणारी मुले फटाफट संगणकावर,मोबाईलवर टाइप करायला लागली. त्यामुळे याचे हस्ताक्षर चांगले, त्याचे वाईट ही तुलना बंद झाली. काही जण तर लिहिण्यापेक्षा जास्त वेगाने टाइप करतात. झेरॉक्स मशीन आल्यापासून हाताने कॉपी करणे केव्हाच बंद झाले. ट कॉपीच्या नकला करणे विस्मृतीत गेले. तसेही इंटरनेट, ई-मेल आल्यापासून बरीच स्थित्यंतरे आपण बघितली. पैशांचे व्यवहार आता नोटाच्या अदलाबदलीने होत नाहीत. ई-ट्रान्सफर कॉमन झाले. तसेच हे एआय प्रकरणदेखील स्वीकारले जाईल. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण दुसरा काही पर्याय नसल्याने आपण स्वीकारलेच की नाही? उलट एआय शिक्षक अधिक चांगले सर्वंकष पद्धतीने शिकवतील. ते कसलाही भेदभाव करणार नाहीत. हे शिक्षण अधिक पर्सनल होऊ शकेल. तुमची क्षमता ओळखून, तुमच्या गरजा ओळखून त्यानुसार शिकवण्याच्या पद्धतीत, गतीत बदल केले जातील. अगदी आतासुद्धा अनेक विषयांवर यूटय़ूबवर जी देशविदेशातील प्राध्यापकांची लेक्चर्स उपलब्ध आहेत ती तुम्हाआम्हाला वर्गात शिकवल्या गेलेल्या लेक्चर्सपेक्षा कितीतरी पटीने वरच्या दर्जाची आहेत. कुठलीही संकल्पना यूटय़ूबवर अर्ध्या, पाऊण तासाच्या लेक्चरद्वारे उत्तमरीत्या समजावली जाते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात तरी एआयमुळे आमूलाग्र चांगलेच बदल होतील. घरबसल्या शिकणे सहज साध्य होईल.
आता एआयमुळे नोकऱया जातील, करीअरवर परिणाम होईल अशी भीती व्यक्त केली जाते. यात थोडय़ाफार प्रमाणात तथ्य असले तरी यापुढे नोकरी, करीअर, उत्पन्नाचे स्रोत यांच्या व्याख्याच बदलतील. कामाचे स्वरूप पूर्णतः बदलेल. तुम्ही आतासारखी एकच नोकरी करणार नाही. एकाच ऑफिसात जाणार नाही. अनेक सृजनात्मक कामे घरबसल्या करता येतील. दळणवळण कमी होईल. प्रवासातला वेळ, त्रास वाचेल. तुम्हाला तुमचे छंद जोपासता येतील. नाती जपता येतील. कुटुंबाला जास्त वेळ देता येईल. अशा आगळ्यावेगळ्या क्रांतीला सामोरे जावे लागेल. आतापर्यंत होणारे अनेक बदल आपण स्वीकारलेच की! तसेच या नव्या बदलांचीदेखील आपल्याला आपोआप सवय होईल.
आपल्या आजी-आजोबांचे जग किती वेगळे होते. आता तेदेखील स्वप्नच वाटते. तसेच आपल्या नातवा, पणतूच्या जगाचे रंगरूपदेखील सर्वस्वी भिन्न, कल्पनातीत असेच असेल. ती मंडळीदेखील अॅडजस्ट होतील…आपण झालो तसे! त्यामुळे घाबरायचे, चिंतेचे काहीच कारण नाही. ‘एआय येऊ द्या’ असे स्वागत करायला हरकत नाही.