
>> फारुख एस. काझी
इंद्रजित भालेराव! नाव वाचताच शब्दांची एक अनोखी लयबद्ध कलाकुसर डोळ्यासमोर येते. त्यांची कविता म्हणजे सहजता आणि आशयगर्भता यांचा एक अनोखा संगम. गाव, निसर्ग, गावपांढरी, निरागस माया, पाखरं, गुरं आणि निसर्गाच्या कुशीत वसणाऱया चराचराला आपल्या कवितेत शब्द म्हणून पेरणारे एक प्रतिभावंत कवी. त्यांची प्रत्येक कविता ही जणू त्यांची एखादी आठवण तरी असते किंवा त्यांच्या आतीव इच्छेला दिलेलं शब्दरूप तरी असतं. ते कविता लिहीत नाहीत तर जगत असतात, असंच वाटत राहतं. त्यामुळे वाचक त्या कवितेत हरवून जातो. नुकतेच त्यांचे मुलांसाठीचे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तीनही पुस्तकांसाठी चित्रकार म्हणून प्रसिद्ध चित्रकार सरदार जाधव यांनी अत्यंत सुंदर अशी चित्रं दिली आहेत. मुखपृष्ठ आणि आतील चार रंगी चित्रं खूपच बोलकी आणि आकर्षक झाली आहेत.
रानमळ्याची वाट
घरातील एखादी मोठी व्यक्ती लहान मुलाला हाताला धरून शेतात घेऊन जाते. तिथली पिकं, झाडं, फुलंपाखरं, प्राणी आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं नातं लयबद्ध भाषेत सांगू लागते. तेव्हा तीच कविता होऊन जाते. मुलांनी स्वतः वाचून अनुभवावा, मोठय़ांनी वाचून दाखवावा, इतरांना वाचायला द्यावा असा हा मनात खोलवर रुंजी घालणारा कवितासंग्रह!
गाणे गोजिरवाणे
इंद्रजित भालेराव यांची जडणघडणच मुळात ग्रामीण जीवन, तिथल्या परंपरा, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यांच्या कुशीत झालेली आहे. लोकगीतांनी त्यांच्या बालपणात कवी होण्याचं स्वप्न पेरलं असणार. ‘गाणे गोजिरवाणे’ या कवितासंग्रहात हे पदोपदी जाणवतं. हा कवितासंग्रह म्हणजे मुलांच्या लोकगीतांचा संग्रह आहे. एकाहून एक धम्माल लोकगीतांची भेट सर्वच मुलांना आवडतील अशी आहेत.
नातूऋतू
साहित्यात साहित्यिकाच्या अनुभवांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. साहित्यिक जे जगतो, भोगतो ते शब्दांत बांधण्याचा प्रयत्न करत असतो. भालेराव सरांनी त्यांच्या नातवाला केंद्रस्थानी ठेवून काही कविता केल्या होत्या. त्या मूळ कल्पनेवर हा कवितासंग्रह बेतलेला आहे. आजोबा, आजी, आई, पपा, आजोळ यांच्या नजरेतून बाळलीळा चितारल्या आहेत. बाळाचा जन्म, त्याचं रांगणं, दुधाचे दात, जावळ, चालणं, दुडूदुडू धावणं, फिरायला जाणं, त्याचा लागलेला लळा, तो नसल्यावर येणारी उदासी या सर्व गोष्टी यात आलेल्या आहेत. एका आजोबांनी नातवाला केंद्रस्थानी ठेवून केलेला हा मराठीतील पहिलाच कवितासंग्रह असेल. नातवाच्या जीवनातल्या वाढीच्या काळातले विविध ऋतु इथं अनुभवायला मिळतात. जन्मापासून तो धावू लागेपर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. बाळाच्या वाढीचे ऋतूच म्हणा ना!
मुलांचं जगाला निहाळणं, वस्तू हाताळणं, कागद-पुस्तक फाडून त्याचा आनंद घेणं, पेपर वाचनं या सर्व गोष्टी खूप माजेदारपणे येत राहतात. आणि सर्व कौतुक आजोबा न्याहाळतात आणि शब्दांत मांडत राहतात. एकंदरीत खूप सुंदर आणि आनंदी अनुभव देणारा हा कवितासंग्रह वाचायला हवा, वाचून दाखवायला हवा. वाचायला द्यायला हवा.
- रानमळ्याची वाट Eिकमत रु. 160
- गाणे गोजिरवाणे Eिकमत रु. 160
- नातूऋतूकिंमत रु. 180
कवी ः इंद्रजित भालेराव
प्रकाशक ः विलास फुटाणे, आदित्य प्रकाशन