परीक्षण – विविधरंगी अनुभवांचा प्रसन्न शिडकावा!

>> राहुल गोखले

दैनंदिन आयुष्यात सामान्यत प्रत्येकाला येणारे अनुभव एकसारखेच असतात. फरक असतो तो त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात. त्यामुळेच त्या अनुभवांचे कथन हे ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या स्वरूपाचे असू शकते आणि ते कथन अन्यांनादेखील निराळी दृष्टी देऊ शकते. सुधांशू नाईक यांचे ‘मनातलं…मनापासून’ हे पुस्तक त्याची प्रचीती देईल. लेखकाने लिहिलेली ही एका अर्थाने स्फुटच. प्रत्येक लेख पुस्तकाच्या एखाददोन पानांत बसेल इतकाच. त्यात पाल्हाळ नाही; पण म्हणून त्रोटकपणा किंवा तुटकपणाही नाही. प्रसन्न, ललित शैलीत लिहिलेले हे लेख आहेत.

या लेखांची शीर्षके न्याहाळली तर ती वरकरणी अगदी रोजच्या आयुष्यातील, नेहमीच ज्यांना सामोरे जातो अशा अनुभवांची जाणीव करून देतील. ‘पिंपळपान’, ‘हास्य’, ‘सुख’, ‘सहवास’, ‘वृक्ष’, ‘पानं’, ‘आंबा’, ‘कांदेपोहे’ ही शीर्षकांची मासलेवाईक उदाहरणे. मात्र त्याबद्दल लिहिताना लेखकाने कधी समर्पक काव्यपंक्तींचा; कधी संतसाहित्यातील उद्धृतांचा, कधी जीवनविषयक तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनाचा समावेश केल्याने लेख खुमासदार झाले आहेत. उदाहरणार्थ ‘पिंपळपान’ लेखात शिशिरात पिंपळाचे निष्पर्ण रूप पाहून आणि नंतर काही दिवसांनी त्याच वृक्षाला फुटलेली पालवी पाहून ‘आयुष्य हे असेच असते का? कधी सगळे संपले असे वाटत असताना कुणाची तरी आश्वासक सोबत ऊर्जा देऊन जाते का? असा प्रश्न पडतो असे लेखक म्हणतो. ‘सुख’ या लेखात लेखक आपल्या सुखाच्या कल्पना विशद करतो. त्यातील एक, ‘भटकंती करत करत गडकोट चढून जावेत… घामाने डबडबलेले, तहानलेले आपण आणि समोरच थंडगार पाण्याची टाकी दिसणे म्हणजे सुख’ असे लिहिताना लेखक बहुधा सुख हे छोटय़ा, पण नेमक्या वेळी मिळणाऱया गोष्टींतच कसे असते याकडे अंगुलीनिर्देश करीत असावा. लेखकाला भटकंतीची प्रचंड आवड. साहजिकच निसर्ग हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय आणि निसर्गाची वेगवेगळी रूपे लेखकाला वेगवेगळे विषय देतोही. निसर्गाशी निगडित अनेक लेख पुस्तकात असणे स्वाभाविक. पक्षी या लेखात लेखक लिहितोः “पक्ष्यांचे, प्राण्यांचे जीवन मला ‘गडय़ा आजचा दिवस आपुला रे, जगून घे’ असे सांगणारे वाटते.’’ सूर्य, चंद्र, पौर्णिमा, माती, पाऊस, आषाढ, वारा, समुद्र, तळ्याकाठी या आणि अशा लेखांतून लेखकाने सृष्टीतील अनेक लोभस घडामोडींचे वर्णन केले आहे.

प्रवासाची साधने म्हणजे अगदी दुचाकीपासून विमानांपर्यंत लेखकाने सर्वांवर लिहिले आहे. त्यातही रेल्वेविषयी सर्वांच्याच मनात एक आकर्षण असते. तसे ते लेखकाच्या बाबतीतदेखील आहे. तो लिहितोः ‘जी गावं स्टेशन किंवा रेल्वेच्या अगदी जवळ, त्यांचं तर रोजचं जगणं त्या वेळापत्रकाशी जुळलेलं असतं.’ किराणा मालाच्या दुकानात केवळ सामानाची देवघेव होत नाही, तर नाती जपली जातात, असे एका लेखात लेखक लिहितो. खाणावळीबद्दल लिहिताना लेखक म्हणतोः ‘आपण आपल्या जिवलगांपासून दूर राहत असताना मिळालेली ही माया कशी विसरता येईल?’ अशा काही हृद्य आठवणींनी पुस्तकाची खुमारी वाढली आहे. स्वच्छतेपासून सौंदर्यापर्यंत, खेळांपासून मैदानापर्यंत, लहानपणापासून वृद्धत्वापर्यंत, नाटकापासून सिनेमापर्यंत आणि उन्हाळ्यापासून वळिवापर्यंत बहुविध विषय लेखकाने हाताळले आहेत. या लेखांत काही ठिकाणी स्मरणरंजन आहे; काही ठिकाणी अनुभवांची पखरण आहे; काही ठिकाणी मनुष्य स्वभावाच्या कंगोऱयांचे दर्शन आहे; पण या सर्व लेखांतील साम्य म्हणजे लेखकाला माणसाविषयी आणि एकूणच जीवनाविषयी असणारी ओढ व कृतज्ञता.

रोजच्या आयुष्यात तेच तेच येणारे अनुभव माणसाला रूक्ष करू शकतात, पण त्याच अनुभवांत नावीन्य शोधले तर मनाची प्रफुल्लता कायम राहते याची प्रचिती हे लेख वाचून वाचकांना येईल.  पुस्तकाला वीणा देव यांची प्रस्तावना लाभली आहे. ऋतुराज कुलकर्णी यांनी केलेले मुखपृष्ठ वेधक.