
>> महेश कोळी
भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ मानवसदृश म्हणजेच ह्युमोनॉईड रोबोच्या विकासावर काम करत आहेत. हे रोबो केवळ लष्करी कारवाईत मानवी सैनिकांना मदत करणार नाहीत, तर स्वतःदेखील युद्धात सहभागी होतील. हे रोबो नियंत्रण रेषेवर, प्रामुख्याने दहशतवाद्यांचा गड असलेल्या भागात लष्कराच्या कारवाईला बळ देण्यासाठी आणि सुरक्षा दलाच्या संरक्षणासाठी मोलाची भूमिका बजावतील. सीमेवर रोबो सैन्य असल्याने संपूर्ण लष्कर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडविली. भारताच्या संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची पोलखोल केली. संघर्ष कोणताही असला तरी त्यामध्ये होणारी मनुष्यहानी हा चिंतेचा विषय ठरतो. प्रामुख्याने सीमेवरचे जवान आणि नागरिकांचे जीव हे मृत्यूच्या छायेत असतात. अशा स्थितीत त्यांचे प्राण वाचावेत यासाठी भारतीय लष्करात आता रोबो सैनिक सामील करण्यात येणार आहेत. या माध्यमातून रक्तपात न करताही पाकिस्तानसारख्या शत्रूला वठणीवर आणणे आणखी सोपे जाणार आहे.
मनुष्याच्या विचारात असंख्य संकल्पना दडलेल्या असतात. कल्पनेच्या विश्वात डुबक्या मारणारे विचार जेव्हा प्रत्यक्षात उतरतात तेव्हा जग आश्चर्यचकित होते. असाच एक आश्चर्याचा धक्का देण्याचा प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ मानवसदृश म्हणजेच ह्युमोनॉईड रोबोच्या विकासावर काम करत आहेत. हे रोबो केवळ लष्करी कारवाईत मानवी सैनिकांना मदत करणार नाहीत, तर स्वतःदेखील युद्धात सहभागी होतील. या रोबोंच्या निर्मितीचा उद्देश दुर्गम भागात लढाईसाठी सज्ज करणे हा आहे. त्यामुळे मानवी रक्त सांडण्याची वेळच येणार नाही.
डीआरडीओची प्रमुख प्रयोगशाळा रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इस्टॅबिलशमेंट (इंजिनीअर्स) या ह्युमोनॉईड रोबोंचा विकास करत आहेत. या मानवी रोबोचा वरचा आणि खालचा भाग मानवी अवयवांप्रमाणे तयार करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चाचण्या पाहता हा प्रयोग यशस्वी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुण्यात आयोजित नॅशनल वर्कशॉप ऑन अॅडव्हान्स लेग्ड रोबोटिक्समध्ये या रोबोंचे सादरीकरणही करण्यात आले. रोबो तयार करण्याचे काम पुढे नेण्यात सेंटर फॉर सिस्टम अॅण्ड टेक्नॉलॉजी अॅण्ड अॅडव्हान्स रोबोटिक्सची मदत घेतली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईनंतर डीआरडीओ या अभियानाला वेग देत आहे. 21व्या शतकातील युद्धं ही केवळ बंदुका, रणगाडे आणि सैनिकांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता (अख), स्वयंचलित तंत्रज्ञान, यंत्रमानव यांचा लष्करी वापर हे आता केवळ विज्ञान कथांतील विषय राहिलेले नाहीत. रोबो सोल्जर्स – म्हणजे स्वयंचलित, कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे यंत्रसैनिक – हे भविष्यातील युद्धाचे वास्तव ठरण्याच्या मार्गावर आहेत, पण या कल्पनेचं मूळ कुठं आहे? दुसऱया महायुद्धाच्या काळात जर्मनी आणि अमेरिका यांसारख्या देशांनी स्पह्टके टाकणाऱया रेडिओ-नियंत्रित बोटी आणि टोचून स्पह्ट करणाऱ्या उपकरणांचा वापर केला. हा अनमॅन्ड वेपन्सचा प्रारंभ मानला जातो. 1980 ते 90 च्या काळात अमेरिकेने आणि इतर प्रगत राष्ट्रांनी ड्रोनचा वापर गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी सुरू केला. इराक आणि अफगाणिस्तान युद्धांमध्ये ड्रोनचा वापर वाढला आणि हळूहळू मानवविरहित युद्धसज्जता हे केंद्रबिंदू बनले. 2000 नंतरच्या काळात डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोग्रेस एजन्सी आणि इतर संस्था स्वयंचलित यंत्रसैनिकांच्या संकल्पना विकसित करू लागल्या. बिगडॉग, अॅटलास, मार्ससारखे (मॉडय़ुलर अॅडव्हान्स्ड आर्म्ड रोबोटिक सिस्टीम) ग्राऊंड यंत्रमानव युद्धासाठी प्रयोगात आणले गेले. आधुनिक युद्धात आता काही रोबोट शत्रू ओळखून गोळीबार करण्यास सक्षम झाले आहेत. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, 2040 पर्यंत जगात अशा यंत्रसैनिकांची तुकडी अस्तित्वात येईल, जी मानवाच्या मदतीशिवाय युद्ध करू शकेल. सैनिकांच्या ताकदीत आणि चपळतेत वाढ करणारे यांत्रिक सूट विकसित होत आहेत. हे एक प्रकारचे अर्ध-रोबोटिक सोल्जर रूप असते.
इस्रायलने अगोदरच अशाच प्रकारचे ‘रोक रोबो सैन्य’ तयार केले असून ते केवळ युद्ध लढणारे नाही, तर सीमेवर माणसांची जागादेखील घेऊ शकेल. इस्रायलची प्रसिद्ध संरक्षण कंपनी इल्बिट रोबो टीमने रोबो सैनिकांची निर्मिती केली आहे. रोबो टीमचे सीईओ इलाजलेव्ही यांच्या मते ड्रोन आणि हवाई रोबोच्या माध्यमातून होणारे काम आता प्रत्यक्षपणे जमिनीवरही होईल. मानवरहित रोक रोबो हा धोक्याचे आकलन करत निर्णय घेऊ शकणार आहे. एआययुक्त रोबो हा युद्धाच्या मैदानात खराब झाल्यास त्याच्या समवेत असणारा रोबो सैनिक हे त्याचा सुटा भाग बदलण्याचे काम करतील. या वैशिष्टय़ामुळे रोबो सैनिक अचानक निकामी होण्याची भीती राहणार नाही. 200 किलो वजनाच्या या रोक रोबोची धावण्याची क्षमता तीस किलोमीटर प्रति तास आहे. हा 1200 किलोमीटर मारक क्षमतेचे शस्त्र घेऊन जाण्यास सक्षम आहे. त्याची किंमत दीड लाख डॉलरपासून तीन लाख डॉलरपर्यंत आहे. एकंदरीतच भविष्यातील युद्ध रोबोत होईल.
आर्टिफिशल इंटेलिजन्सने दहा वर्षांपासून असामान्यपणे कामगिरी केली आहे. त्यामुळे जगभरात सध्या एआयचा बोलबाला आहे, पण एलॉन मस्क, बिल गेट्स, स्टीफन हॉकिंग यांनी मात्र एआयच्या अद्भुत शक्तीबाबत जगाला वारंवार सजग केले आहे. तरीही गुंतवणूकदार आणि शास्त्रज्ञ एआयकडे एक उज्ज्वल भवितव्य म्हणून पाहत आहेत. कारण आज रोबो हा कारखान्यात मजुरी करण्यापासून शिक्षक, टीव्ही समालोचक, परिचारिका आणि आता सैनिकी भूमिकेत अवतरत आहे. मानव आणि मशीन यांच्यात होणारे द्वंद्व हे कोणत्या रूपातून समोर येईल हे भविष्यातच कळेल. मात्र आतापर्यंत एआयचे नवे आविष्कार अनेक प्रश्नांना जन्माला घालणारे ठरले आहेत.
भारत सरकारदेखील एआयने निर्मित रोबोटिक शस्त्रांची संख्या वाढविण्याचा विचार करत आहे. यानुसार एक महत्त्वाकांक्षी संरक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश मानवरहित रणगाडा, लढाऊ जहाज, स्वयंचलित रायफल आणि रोबो लष्कर उभारण्याची तयारी. विमानांनादेखील रोबोटिक शस्त्रांनी सज्ज केले जाणार आहे. ही योजना अमलात येईल तेव्हा भारत जमीन, आकाश आणि पाणी या तिन्ही ठिकाणी लढाईसाठी नवीन तंत्र वापरण्यास सज्ज असेल. टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालचा एक उच्चस्तरीय गट या योजनेला अंतिम रूप देत आहे. यात डीआरडीओदेखील मदत करत आहे. प्रत्यक्षात भविष्यात युद्धात रोबो आणि मानविरहित शस्त्रांचा अधिक वापर केला जाईल.
एकंदरीतच भारतीय युद्ध आणि संरक्षण प्रणालीत सर्वंकष बदल केले जात आहेत. सैनिकांना रोबोटिक तंत्रज्ञानाने जोडण्यासाठी आयआयटी शास्त्रज्ञांनी आधुनिक संरक्षण उपकरण विकसित करत इतिहास घडविला आहे. सैनिकांचा एक विश्वासू साथीदार म्हणून इंटेलिजट रोबो तयार केला आहे. आता दुसरा शोध थर्मल जॅकेटचा असून तो जीवघेण्या उष्म्यापासून सैनिकांचा बचाव करेल.