
>> वृषाली साठे
गोदावरीला त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे रावणाला त्यांना एकटीला सामोरे जायचे होते. मनाची तयारी करून त्या फळांची टोपली घेऊन बाहेर आल्या. त्या वेळी त्यांना पूर्ण जाणीव होती की त्या एका कृष्णविवराकडे जात आहेत. पण शूरपणे त्या येईल त्या प्रसंगाला सोमोरं जाण्यासाठी तयार होत्या. रावण आणि सीतामाई यांच्या मधल्या अंतर्मनातील युद्धाची सुरुवात झाली होती.
गोदावरीला भेटून सीतामाई श्रीरामासह कुटीत परतल्या. त्यांना खुश करण्यासाठी श्रीराम कारणे शोधू लागले आणि त्यांच्या दृष्टीस सोनेरी हरण पडले. श्रीराम सीतामाईला म्हणाले, अशी सोनेरी हरणे मिथिलेनंतर आपल्याला कुठे दिसलीच नाहीत. सीतामाई म्हणाल्या, मला कुठेच हरीण दिसत नाही. श्रीराम म्हणाले, थांब, मी तुझ्यासाठी ते हरीण घेऊन येतो. ते धनुष्यबाण घेऊन कुटीबाहेर पडले.
सीतामाईना काहीतरी अशुभ जाणवत होते. धावत जाऊन श्रीरामांना अडवावे, त्यांना नका जाऊ असे सांगावे, असे त्यांना वाटत होते. पण त्यांचे पाय जड झाले आणि तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते.
नियतीने आता तिचे काम केले होते. सीतामाईंने गोदावरीला पुढल्या घटनाक्रमासाठी सहमती दिलेली होती. त्यामुळेच सीतामाई श्रीरामांना मनात असूनही अडवू शकत नव्हत्या.
बराच वेळ झाला. लक्ष्मणजी सीतामाईंना चिंतातूर बघून म्हणाले की, काळजी करू नका. श्रीरामजी लवकर परत येतील. खूप वेळ गेला. लक्ष्मणजी व सीतामाई दोघेही श्रीरामांची वाट बघत होते. तेवढय़ात त्यांना रामाचा आवाज ऐकू आला. सीतामाईना जाणवते की हा रामाचा आवाज नक्कीच नाही. पण ‘लक्ष्मणा धाव’ असे रामाच्या आवाजातील हाक ऐकून लक्ष्मणजी संभ्रमात पडले. रामाच्या मदतीला जाऊ की इथेच थांबू. शेवटी सीतामाई त्यांना जायला सांगतात. नाईलाजाने लक्ष्मणजी निघतात आणि सीतामाईंना विनंती करतात की तुम्ही कुटी सोडून कुठेही जाऊ नका.
सीतामाईंना वाटते की, लक्ष्मणजीना सांगावे की मी पण येते तुमच्याबरोबर श्रीरामांना शोधायला. पण पुन्हा त्यांचे पाय जड होतात आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत नाहीत.
सीतामाई कुटीत आतमध्ये जातात. त्यांना दारातून अंगणाबाहेर उभा असलेला तो दिसतो. तो रावणच असतो. जो साधूच्या वेशात अन्नासाठी याचना करत असतो. कोणालाही अन्न नाकारणे सीतामाईंसाठी अशक्य होते. रावणाला बघताच त्यांना जनकबाबांचा त्याने केलेला अपमान आठवतो. गोदावरीला त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे रावणाला त्यांना एकटीला सामोरे जायचे होते. त्यांनी मनाची तयारी केली. फळ असलेली टोपली घेऊन त्या बाहेर आल्या. त्यांना जाणीव होती की त्या एका कृष्णविवराकडे जात आहेत. पण शूरपणे त्या येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी तयार होत्या. पण ज्या क्षणी रावणाने त्यांचे मनगट धरले. त्या क्षणी त्यांनी जोरात किंकाळी फोडली. कारण त्या क्षणी त्यांचे श्रीरामाबरोबर असलेले सोनेरी धागे तुटले. ज्या धाग्यांमुळे न बोलताही त्यांचे एकमेकांबरोबर संभाषण व्हायचे, त्यांना एकमेकांच्या हृदयाची धडधड जाणवायची.
हे सीतामाईंसाठी अनपेक्षित होते. श्रीरामांबरोबर असाही वियोग होईल असे त्यांना वाटले नव्हते. यापुढे त्यांना एकटीला संघर्ष करायचा होता. त्याचप्रमाणे कलशामार्फत सोमाचा सीतामाईंशी असलेला संपर्कदेखील संपला.
एवढी गोष्ट सांगून सोमा थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. अनुसूया आणि तिच्या आईलादेखील रडू थांबवता येत नव्हते. अनुसूयेला मात्र एका प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.
सीतामाईंच्या सहमतीशिवाय जगातील एक पानदेखील हलू शकत नाही. रावणाकडे कितीही शक्ती असल्या तरी तो सीतामाईंचे अपहरण त्यांच्या मर्जीशिवाय करू शकत नाही.
सोमा पुढे म्हणते, सीतामाईबद्दल सगळ्यांना किती कमी माहिती आहे. रावणाने त्यांना बंदी बनवून अशोकवनात ठेवले, त्यांना खूप त्रास दिला, श्रीरामजी आणि लक्ष्मणजी यांनी रावणाला हरवून त्यांना अयोध्येमध्ये परत आणले. श्रीरामांचा पराक्रम व त्यांचा झालेला विजय सगळ्यांना माहीत आहे, पण या सगळ्यात सीतामाईंनी केलेला त्याग, बलिदान, त्यांनी केलेला पराक्रम कोणालाच माहीत नाही.
सीतामाईंनी पण अयोध्येत आल्यावर त्यांच्या लंकेतील वास्तव्याबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. अगदी श्रीरामांनादेखील नाही.
पण त्यांनी हे सगळे हनुमानाला सांगितले होते. हनुमान आणि सीतामाई या दोघांमध्ये एक अद्भुत पुत्र आणि माता हे नाते होते. हनुमान त्याच्या सीतामातेसाठी काहीही करायला सदैव तयार असायचा. सीतामाईनी कधीही त्यांनी केलेल्या महान कार्याचा उल्लेख केला नाही. कारण त्यांना कीर्तीची कधीच अपेक्षा नव्हती. पण सीतामाई जेव्हा आपला पृथ्वीवरील अवतार संपवून निजधामाला गेल्या. तेव्हा ही कथा हनुमानाने सोमाला सांगितली.
बघा, आपल्या कथेत आता पवनपुत्राचे आगमन झाले आहे. आता या पुढील कथा आपल्याला हनुमानजी सोमामार्फत सांगणार आहेत. रावणाला वाटत होते की, सीतामाई त्याच्या सापळ्यात अडकल्या आहेत, पण झाले होते उलटे. सीतामाईंना लंकेत नेऊन तो स्वतच्या विनाशाच्या सापळ्यात अडकला होता. सीतामाईंना माहीत नव्हते की त्यांना पुढे काय सहन करावे लागणार आहे. पण त्यांना हे नक्की माहीत होते की, ह्या सर्व दुष्ट शक्तींपासून वसुंधरा पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी त्या या भूतलावर आल्या आहेत.
हनुमानजी पुढे म्हणाले, जेव्हा रावण सीतामाईंना खेचत विमानात घेऊन गेला तेव्हा त्याच्या पकडीतून सीतामाई सहज सुटू शकल्या असत्या. त्यांच्याकडे माता लोपामुद्रेने दिलेले प्रभावी मंत्र होते. पण त्यांनी ते वापरले नाहीत. रावणाने अशा रीतीने स्पर्श केलेला बघून मात्र रागाने सीतामाई लालबुंद झाल्या. जणु काही त्यांच्या पूर्ण शरीरातून अग्नी बाहेर पडत होता. रावणाने घाबरून हात सोडून दिला. सीतामाई रागाने व त्वेषाने रावणाला म्हणाल्या, अरे राक्षसा, तुझी हिंमत कशी झाली, मला हात लावायची. लक्षात ठेव, यापुढे तू कधीही मला हात लावू शकणार नाहीस. मी तुझ्याबरोबर लंकेत येईन, पण माझ्या इच्छेने. तू मला कधीही बंदी बनवू शकत नाहीस.
सीतामाईंनी हनुमानाला सांगितले, “मी रागाने लालबुंद झाले, मी माझा राग शांत करू शकत नव्हते. पण जेव्हा श्रीरामांना आदल्या दिवशी त्यांच्या डोळ्यात पाहात मी त्यांना जे सांगितले ते आठवले. मग श्रीरामांना आठवत मी शांत होण्याचा प्रयत्न करू लागले. मला जाणवले की मला अधिक सावध राहण्याची गरज आहे. सीतामाईंनी नंतर जटायूला पाहिले. त्याने निकराने रावणाबरोबर युद्ध केले. जेव्हा पंख कापले गेले तेव्हा जटायू खाली पडला. सीतामाईंना खूप दुःख झाले. आपण या आधीही पाहिले आहे की सीतामाई कोणाचेच दुःख बघू शकत नव्हत्या. मग जटायूचे दुःख त्या कशा बघू शकल्या असतील? सीतामाईंनी स्वत जटायूच्या वेदना स्वीकारल्या. त्यांना आपले हात कापले गेले आहेत या वेदना जाणवल्या. तेव्हा वायुदेव येऊन तिच्या कानात बोलले, माता हा पहिला बळी आहे. पुढे महासंग्रामात किती बळी जातील सांगता येत नाही.
सीतामाई श्रीरामांची आठवण येताच खूप कासावीस झाल्या. आपण आश्रमात नाही बघून श्रीरामांना किती दुःख होईल या विचाराने त्या खूप दुःखी झाल्या. त्यांनी आपले सर्व दागिने एका उत्तरायणात बांधून विमानातून खाली फेकले. जेणेकरून श्रीरामांना त्यांचा काहीतरी ठावठिकाणा लागावा. यानंतर सीतामाई अजून सतर्क झाल्या, कारण त्यांचा संकल्प खूप मोठा होता. त्यांना रावणाच्या हृदयसाम्राज्यात शिरून त्याला चांगल्या मार्गांवर घेऊन यायचे होते. पण रावण वेगळ्याच गुर्मीत होता. रावणाची इच्छा होती की सीतामाईंना साखळदंडाने बांधून लंकेत घेऊन जावे. पण सीतामाईंकडे बघून त्याची तशी हिंमत झाली नाही.
जेव्हा विमान लंकेत उतरले तेव्हा सीतामाई स्वत विमानातून बाहेर उतरून आल्या. बाहेर खूप गर्दी जमली होती. लंकेतील सगळी प्रजा, रावणाचे सेनाधिकारी, राजघराण्यातील व्यक्ती सगळेजण होते. त्यात शूर्पणखा पण होती. तिच्या चेहऱयावर एक विकट हास्य होते. सीतामाईकडे बघून ती थुंकली आणि म्हणाली, की आज माझा बदला पूर्ण झाला.
सीतामाई तिला काहीही प्रतिक्रिया देत नाहीत. त्या शांतपणे व निर्भयपणे सरळ चालत गेल्या. एक मोठे प्रवेशद्वार ओलांडून त्या पुढे गेल्यानंतर एक मोठे प्रांगण लागले. त्या प्रांगणाच्या मागे एक उपवन होते. त्या उपवनाला कुंपण म्हणून मोठय़ा भिंती होत्या. सीतामाई त्या उपवनात जातात, इकडे तिकडे बघतात. त्यांना एक अशोक वृक्ष दिसतो. त्यांना जाणवते की तो वृक्ष त्यांना स्वतजवळ बोलावतो आहे. त्या अशोक वृक्षापाशी गेल्या आणि झाडाला पाठ टेकून खाली बसल्या.
निसर्गाच्या प्रेमळ स्पर्शाने त्यांना थोडे बरे वाटले. त्यांनी पाहिले की आजूबाजूला भयंकर राक्षसिणी पहारा देत आहेत. त्यातील जी थोडी शांत स्वभावाची असते, ती फळाची टोपली व पाणी घेऊन सीतामाईंजवळ येते आणि म्हणते, राजकुमारी सीता, तुम्हाला भूक लागली असेल. थोडं खाऊन घ्या. सीतामाई खाण्यासाठी नकार देते. पण दोन घोट पाणी घेते… आणि इथेच रावणाची मायावी शक्ती काम करते. रावण आणि सीतामाई यांच्या मधल्या अंतर्मनातील ( Psychological war) युद्धाची सुरुवात होते.