लेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा

कश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे कश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर त्यावेळी फक्त एक ब्रिगेडम्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केले होते आणि 1999 साली पाकिस्तानी सैन्याने हिंदुस्थानी सैन्य पहारा देत नसलेल्या याच कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण 26 जुलै 1999 रोजी हिंदुस्थानी लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवसम्हणून साजरा केला जातो.

जगभरात उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक उदाहरण आहे. पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात मारले गेले. हिंदुस्थानी लष्करातील 543 अधिकारी आणि जवानांना या युद्धात वीरमरण आले. 1300 जवान जखमी झाले.

‘स्पेशल सर्व्हिसेस’च्या सर्वोत्कृष्ट तुकडय़ा तसेच ‘नॉर्दन लाइट इन्फ्रन्ट्री’च्या 11 बटालियन तुकडय़ा या युद्धात गुंतवल्या होत्या. हिंदुस्थानी सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कारवाई चालू केली. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता रेजिमेंटल व बटालियनपुरतीच कारवाई शक्य होती. त्यामुळे फौजेची संख्या केवळ 20 हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली. टायगर हिल व तोलोलिंग येथील संग्राम हा हिंदुस्थानी जवानांच्या साहसाचा, पराक्रमाचा कळस अध्याय समजला जातो.

कारगिल युद्धात अतिशय क्रूरपणे ठार मारलेल्या लेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही हिंदुस्थानींच्या जिभेवर आहे.  मे 1999 रोजी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर गेले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली.

कारगिल युद्धात हुतात्मा झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना ‘शेरशाह’ असे म्हणत. केवळ 18 महिन्यांपूर्वी हिंदुस्थानी लष्करात भरती झालेले बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते की, “हिंदुस्थानचा विजयी ध्वज रोवून परत येईन किंवा त्यात लपेटून येईन.’’ त्यांच्या कंपनीला ‘पॉइंट 5140’ पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभूल करण्यासाठी शिखराच्या दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तीन जवानांना ठार मारले, परंतु या लढाईत ते जखमी झाले. तरीही ते लढत राहिले. 20 जून 1999 रोजी सकाळी 3.30 वाजता त्यांच्या कंपनीने शिखर ताब्यात घेतले. हे शिखर ताब्यात घेतल्यानंतर बत्रा म्हणाले होते, “ये दिल मांगे मोअर.’’ त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची वीरता दडलेली आहे. 8 जुलै 1999 रोजी हिंदुस्थानी लष्कराने ऐतिहासिक यश मिळवित 16 हजार फूट उंचीवर असलेले ‘4875 शिखर’ परत मिळविले, परंतु या मोहिमेत कॅप्टन बत्रा कामी आले. ‘4875 शिखर’ सर करताना बत्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत येण्यास मनाई केली. “तुमच्या मागे मुलंबाळं आहेत,’’ असे म्हणत तेच पुढे गेले. बत्रा यांना मरणोपरांत ‘परमवीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

‘राजपूताना रायफल्स’मध्ये असलेले कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात ‘डर्टी डजन’ या 12 सदस्यीय घातक टीमचे प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे टोलोलिंग शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 12 जून 1999 च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला ‘लीड’ केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडले. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी केवळ 15 मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराच्या अनेक जवानांचा खात्मा केला. यात त्यांना वीरमरण आले.

‘बॅटल ऑफ थ्री पिंपल्स’मध्ये त्यांना शिखर ताब्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या प्लाटूनचे कमांडर मेजर पी. आचार्य हुतात्मा झाले तेव्हा त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा प्रवास करून मुलगा जेथे हुतात्मा झाला होता तेथे जातात. मुलाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द ते आजही पाळतात.

‘खालूबर रिजलाइन’ला पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून सोडविताना कॅफ्टन मनोज पांडे हुतात्मा झाले. कारगिल सेक्टरमधील ‘खालूबर रिजलाइन’ अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाण होते. त्यावर पाकिस्तानी लष्कराने कब्जा केला होता. 23 जुलैच्या रात्री पाकिस्तानी जवानांनी कॅप्टन पांडे आणि त्यांच्या टीमवर तुफान गोळीबार केला. शत्रुपक्षाचे लक्ष विचलित करण्याची जबाबदारी पांडे यांना देण्यात आली होती. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या दोन जवानांना ठार मारून पहिल्या ‘पोझिशन’वर कब्जा केला. त्यानंतर आणखी दोन जवानांना मारून दुसरे ‘पोझिशन’ही मिळविले. तिसऱ्या  ‘पोझिशन’वर हल्ला करताना त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली. जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रुपक्षावर गोळीबार सुरू ठेवला. कॅप्टन पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौथी ‘पोझिशन’ही ताब्यात घेतली. यावेळी पाकिस्तानी लष्कराची एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली आणि त्यांनी वीरमरण आले. यावेळी त्यांचे अंतिम शब्द होते, “ना छोडनू!’’ (या नेपाळी भाषेतील वाक्याचा मराठी अर्थ होतो ‘त्यांना सोडू नका!’) 24 वर्षांचे पांडे यांना मरणोपरांत ‘परमवीरचक्र’ प्रदान करण्यात आले.

द्रास गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत ती नजरेस पडतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांपुढे आणि वीरगती पत्करलेल्या हुतात्म्यांपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या बलिदानाला पाहिजे तसे महत्त्व मात्र दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान विकसित केले तरी युद्ध जे जिंकले जाते ते सैनिकांच्या जोरावरच. जे राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आजघडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तरच या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.