
>> अस्मिता येंडे
जेव्हा संदेशवहनाची प्रभावी साधने उपलब्ध नव्हती तेव्हा ‘पत्र’ हाच एकमेव आधार होता. झटपट प्रतिक्रिया मिळण्याची सवय लागलेल्या आताच्या पिढीला प्रतीक्षा करण्याची संयमित भूमिका निभावणे कठीणच आहे. पत्रांचे विविध प्रकार आपणास माहीत आहेत. औपचारिक, अनौपचारिक अर्थात वैयक्तिक, कार्यालयीन पत्रव्यवहार केले जात असत. ज्या काळी लांब असणाऱया व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी पत्र लिहिली जायची, भावनांचा भार त्यावरच असायचा, म्हणून तो मानवी जीवनाच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला.
ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. अनंत देशमुख यांचे ‘पत्रसंस्कृती’ हे पुस्तक साहित्यविचारांचा अनमोल संदर्भमूल्य लाभलेले पुस्तक आहे. या पुस्तकात विविध लेखक, संपादक, वाचक, प्रकाशक यांनी डॉ. देशमुख यांच्याशी केलेल्या वाङ्मयीन पत्रव्यवहाराचे एकत्रित संकलन वाचायला मिळते. यात समाविष्ट केलेली पत्रे खरेतर दुर्मीळ दस्तऐवज आहे, जो त्यांनी जपून ठेवला. त्यांनी केलेले लेखन तसेच त्यांच्या साहित्यकृतींशी संबंधित विचारविनिमय हे या पुस्तकाचे स्वरूप आहे. या पुस्तकाचे संपादन प्रदीप गुजर यांनी केले आहे.
डॉ. अनंत देशमुख यांनी ललित, आलोचना, धर्मभास्कर, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवशक्तीमधून लेखन केलेले आहे. विविध पुस्तकांची परीक्षणे त्यांनी सखोलपणे लिहिली आणि त्यांचे परीक्षणपर लेख वाचून विविध वाचक त्यांना पत्राद्वारे प्रतिक्रिया कळवू लागले. त्यातच आपल्या पुस्तकावर डॉ. देशमुख यांनी परीक्षण लिहावे, त्यांचा अभिप्राय नवोदितांना प्रोत्साहन देणारा आहे, हे वैशिष्टय़ काही निवडक पत्रांद्वारे लक्षात येते. लेखनाच्या निमित्ताने, मराठी विषयाच्या अध्यापनानिमित्त तसेच त्यांच्या संशोधक वृत्तीमुळे त्यांचे अनेकांशी स्नेह जुळून आले.
र. धों. कर्वे तसेच श्रीधर बळवंत टिळक या चरित्रांसाठी, प्रत्येक माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी डॉ. देशमुख यांनी सखोलपणे संशोधन केले, संबंधितांशी पत्रव्यवहार केला. त्यासंदर्भात उत्तरादाखल आलेली पत्रे यात समाविष्ट केली आहेत.
‘श्रीधर बळवंत टिळक’ हे पुस्तक वाचून डॉ. र. म. शेजवलकर यांनी मांडलेली मते तसेच ‘विशाखा’ भोवती या पुस्तकातील राहिलेल्या उणीवा शकुंतला क्षीरसागर यांनी पत्राद्वारे कळवल्या, यांनी निदर्शनास आणून दिलेल्या चुका डॉ. देशमुख यांनी मोठय़ा मनाने आणि सहजपणे स्वीकारल्या, याची साक्ष देणारी पत्रे नक्की वाचावी अशी आहेत.
डॉ. अनंत देशमुख यांची 32 पुस्तके प्रकाशित झाली असून आगामी लेखन प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या ग्रंथसूचीवर नजर फिरवली किंवा त्यांचे समीक्षात्मक लेखन वाचले की लक्षात येते, स्वत डॉ. देशमुख म्हणतात त्याप्रमाणे, ‘मी कोणत्याही चौकटीत न बसणारा समीक्षक आहे. ‘पुस्तकाच्या सुरुवातीला संपादक प्रदीप गुजर यांनी डॉ. देशमुख यांची घेतलेली मुलाखत दिलेली आहे, त्याद्वारे समीक्षेचे व्यापक रूप, समीक्षक म्हणून त्यांची भूमिका अभ्यासपूर्ण विषयच बनली आहे. त्यांचे मार्गदर्शन अनेक संशोधकांना, अभ्यासकांना पथदर्शक आहे.
गोविंद तळवलकर, वि. भा. देशपांडे, विद्याधर पुंडलिक, आनंद यादव, वि. वा. शिरवाडकर, सरोजिनी वैद्य, जयवंत दळवी, दाजी पणशीकर, आत्माराम भेंडे, द. ता. भोसले, विजया राजाध्यक्ष इ. (यादी अजून मोठी आहे.) या नामवंतांनी डॉ. अनंत देशमुख यांच्याशी केलेला वाङ्मयीन पत्रसंवाद ‘पत्रसंस्कृती’मध्ये समाविष्ट केल्याने वाङ्मयीन संदर्भग्रंथ म्हणून पुस्तकाची उपयोगिता आणि महत्त्व अधिक ठळक होते.
‘पत्रसंस्कृती’मुळे तत्कालीन नियतकालिके, मासिके यांचे स्वरूप, साहित्यमूल्य समजतात तसेच संशोधन, अभ्यासपूर्ण कौशल्याने, इतरांना साहित्यविषयक सहकार्य करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. देशमुख यांचे साहित्यिक भानही अधोरेखित होते.
पत्रसंस्कृती
लेखक ः डॉ. अनंत देशमुख
संपादन ः प्रदीप गुजर
प्रकाशक ः डिंपल पब्लिकेशन
मूल्य ः 375 रुपये