
गेल्या सात महिन्यांपासून मानधनाची फुटकी कवडीही न मिळाल्या आशासेविका आणि गटप्रवर्तकांच्या संतापाचा स्फोट झाला आहे. पालघर जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक आशासेविकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर उपासमार मोर्चा काढला. या मोर्चात गटप्रवर्तकही सहभागी झाले होते. मोदी सरकार हाय हाय.., देवेंद्र फडणवीस हाय हाय.., या सरकारचे करायचे काय? खाली डोके वर पाय.., कोण म्हणतो देणार नाय.. घेतल्याशिवाय राहणार नाय.. अशा गगनभेदी घोषणांनी हजारो आशासेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.
आशासेविका व गटप्रवर्तक या आरोग्य सेवेच्या प्रमुख प्रवाहातील घटक आहेत. या सर्वांचे चरितार्थ त्यांना मिळणाऱ्या मानधनातून चालत आहे. त्यांना नोव्हेंबरपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी आज उपासमार मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मानधन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गटप्रवर्तक व आशासेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, नोव्हेंबर 2024 पासून ते चालू महिन्यापर्यंत रखडलेले मानधन अदा करा, 2025 पासून राज्य शासनाच्या नियमानुसार मोबदला द्या, आदी मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशासेविका कर्मचारी संघाचे सरचिटणीस भगवान दवणे यांनी केले.
उपासमारीची वेळ
सहा महिने झाले अजूनही आम्हाला आमचे मानधन मिळाले नाही. आमची उपासमारी होत आहे. आमची परिस्थिती खूपच खराब आहे. आम्ही आमच्या मुलाबाळांना खायला द्यायचे काय आणि कुटुंब चालवायचे कसे त्यामुळे आज आम्हाला उपासमार मोर्चा काढावा लागत आहे, अशी खंत यावेळी आशासेविका रेखा रणदे यांनी व्यक्त केली