
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून दीड महिना उलटला असला तरी त्यांची कन्या सूची हिला आपल्या आईच्या मृत्यूचा दाखला अद्याप मिळालेला नाही. मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबीयांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याचे तहसीलदार, पनवेल आणि मीरा-भाईंदर महापालिकांचे आयुक्त व नवी मुंबई पोलीस यांच्याकडे अर्ज केले होते. मात्र सर्वच प्राधिकरणांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखल देण्यास टाळाटाळ केली आहे.
अश्विनी बिद्रे यांची नऊ वर्षांपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने आपल्या मीरा रोडमधील घरात हत्या केली होती. याप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकरला २१ एप्रिल रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर अन्य कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना प्रत्येकी सात वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. याचवेळी अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना न्यायालयाने संबंधित प्राधिकरणाला दिल्या होत्या. त्यानुसार सूची गोरे आणि राजू गोरे यांनी हातकणंगले तहसीलदार, पनवेल, मीरा-भाईंदर पालिका आयुक्त आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे अर्ज केला होता न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार
अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला हा माझ्या मुलीसाठी आवश्यक आहे. त्यांची हत्या होऊन नऊ वर्षे उलटले असून याप्रकरणी मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षाही झाली आहे. मात्र तरीही आम्हाला मृत्यूचा दाखला दिला जात नाही. संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला आहे. सुरुवातीला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष केला. आता दाखल्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असून पनवेल, मीरा-भाईंदरचे पालिका आयुक्त आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना प्रतिवादी बनवणार आहे, अशी प्रतिक्रिया राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे.