हिंदुस्थान-पाक लढतीला ‘नो शेक हॅण्ड’ची किनार; सहा दिवसांतच दोन कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा भिडणार

पहलगामवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा माहोल रंगताना दिसत नाहीये. पाकिस्तानचा निषेध म्हणून गटफेरीच्या लढतीकडे हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी पाठ फिरवली होती. याचबरोबर या लढतीत हिंदुस्थानी खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलनही केले नव्हते. या घटनेमुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) तिळपापड झाला होता. आता सुपर-४ फेरीत पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यामध्ये महामुकाबला होणार आहे. स्पर्धेत सहाच दिवसांत उभय संघ पुन्हा भिडणार असल्याने ‘नो शेक हॅण्ड’ची किनार असलेल्या या लढतीमुळे पुन्हा एकदा क्रिकेटविश्व ढवळून निघणार आहे.

हिंदुस्थानने गटफेरीच्या लढतीत पाकिस्तानचा ७ गडी व २५ चेंडू राखून धुव्वा उडविला होता. मात्र, ही लढत हिंदुस्थानच्या विजयापेक्षा पाकिस्तानी खेळाडूंशी न केलेल्या हस्तांदोलन प्रकरणानेच अधिक गाजली होती. पाकिस्तानने आशिया चषकातून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. रेफरींवर पक्षपातीपणाचा आरोप करीत ‘पीसीबी’ने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या घटनाबाह्य मागणीला केराची टोपली दाखविली अन् पाकिस्तानचाही विरोध मावळला. मात्र, रविवारी होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानने पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. ‘टीम इंडिया’चा कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत पाकिस्तानी संघाचं नावही घेतलं नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुपर-४ लढतीलाही ‘नो सेक हॅण्ड’ची किनार असणार हे स्पष्ट झाले आहे.

अक्षर पटेलचे खेळणे संदिग्ध

टीम इंडियाचा अष्टपैलू फिरकीपटू अक्षर पटेल रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात खेळू शकेल की नाही, याबाबत संदिग्धता आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली. १५व्या षटकात हम्माद मिर्झाचा झेल झेलण्याच्या नादात तो खाली पडला आणि त्याच्या डोक्याला जोराची धडक बसली. यानंतर फिजिओच्या मदतीने अक्षरला मैदानाबाहेर नेण्यात आलं. उरलेल्या सामन्यात तो मैदानावर परतला नाही.

अक्षर पटेल मैदानावर उतरला नाही, तर..

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी ‘टीम इंडिया’कडे तयारीसाठी ४८ तासांपेक्षाही कमी वेळ आहे. जर अक्षर पटेल मैदानावर उतरला नाही, तर संघ व्यवस्थापनासमोर तीन फिरकीपटूंना खेळवण्याचं मोठं आव्हान असेल. सध्या हिंदुस्थानकडे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव है दोन प्रमुख फिरकीपटू आहेत. तिसऱ्या फिरकीपट्साठी संघ व्यवस्थापनाला रियान पराग किंवा वॉशिंग्टन सुंदर या राखीव खेळाडूंपैकी एखाद्याला बोलवावं लागेल.

उभय संघ –

हिंदुस्थानी संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू समसन, हर्षित राणा, रिंकू सिंह.

पाकिस्तान टीम – सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, साहिबजादा फरहान, सईम अयूब, शाहीन अफरीदी, सुफियान मुकीम, मोहम्मद वसीम ज्युनियर, हसन नवाज, सलमान मिर्झा.