बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना निधी यासह विविध 17 मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन सरकारच्या आश्वासनानंतर आज स्थगित केले. दरम्यान, बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

बच्चू कडू यांनी 8 जूनपासून तिवसा तालुक्यातील मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या काळात त्यांची प्रकृती खालावली होती. विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. शुक्रवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन फोनवर मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले होते. लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले होते. आज मंत्री उदय सामंत हे सरकारच्या वतीने लेखी आश्वासन घेऊन मोझरी येथे आले. त्यानंतर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे नाही तर तात्पुरते स्थगित करीत असल्याचे सांगितले.

काय आहे सरकारचे लेखी पत्र

  • शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. थकीत कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्याबाबतही निर्णय होईल.
  • दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद केली जाईल.
  • उर्वरित मुद्दय़ांवर संबंधित मंत्री व मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील.