
>> गुरुनाथ तेंडुलकर
भगवद्गीतेतील एक महत्त्वाचा विषय सध्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. स्थितप्रज्ञ… स्थिर बुद्धीचा माणूस…
मागील लेखात आपण अनेक यशस्वी माणसांच्या उदाहरणांतून पाहिलं की, प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये एक समान गुणधर्म असतो तो म्हणजे एकाग्रता. एका वेळी एकच काम करायचं. इंग्रजीत त्याला ‘फोकस’ असं म्हणतात. हा फोकस किंवा एकाग्रता आपल्यासारख्या सर्वसामान्यांना हवी तशी आणि हव्या त्या प्रमाणात साधता येत नाही. याचं कारण म्हणजे आपल्याला नको त्या वाईट सवयी जडलेल्या असतात. आपण सर्वसामान्य माणसं ही कोणत्या ना कोणत्या तरी व्यसनात गुरफटलेला असतो. ही व्यसनं आपला वेळ, पैसा आणि मेहनत कुरतडतात, आपली गाडी प्रगतीच्या मार्गावर सुसाट पळू देत नाहीत. आपण आयुष्यभर सामान्यच राहतो.
मला ठाऊक आहे, तुमच्यापैकी अनेक जणांना ‘व्यसन’ हा शब्द आवडलेला नसेल. आपण त्याला सवय म्हणू या हवं तर. सवयी या दोन प्रकारच्या असतात. चांगली सवय आणि वाईट सवय. या दोन्हीतला फरक ओळखायची सोपी पद्धत सांगतो. ज्या सवयी आचरणात आणताना कंटाळा येतो, ज्या सवयी अंगी बाणवताना कठीण वाटतात, त्या सवयी चांगल्या. या चांगल्या सवयींचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्या चटकन सुटतात. वाईट सवयींच्या बाबतीत नेमका उलटा प्रकार होतो. ज्या आपल्याला आवडतात, करताना मजा वाटते, अंगी चटकन लागतात, पण सोडायच्या म्हटल्या तर मात्र सुटता सुटत नाहीत…
या दोन्ही व्याख्यांवर आपल्या सगळ्या सवयी जरा तपासून पाहू या. सकाळी पाच वाजता उठून चालायला-पळायला जायचं, नियमित व्यायाम करायचा. कोणतंही एखादं पुस्तक उघडून दररोज किमान पन्नास पानं वाचायची दररोज एक नवीन शब्द जाणून त्याचा अर्थ समजून घ्यायचा. चार दिवस उत्साहात आपण पहाटे उठून व्यायामाला जातो, पण नंतर एखाद दिवस पावसाचं निमित्त किंवा आदल्या दिवशीच्या जागरणाचं निमित्त काढून आपण एक दिवस दांडी मारतो. काल दांडी झाली म्हणून आजही कंटाळा करतो आणि ठरवतो की, उद्यापासून नक्की. उद्या ठरवतो की, आता हा शनिवार, रविवार जाऊ दे. सोमवारपासून नक्की!
व्यसन म्हटलं की, ते केवळ विडी-सिगारेट, जुगार आणि बाई-बाटलीपुरतंच मर्यादित नसतं. व्हॉटस्आपवर दिवसभरात आलेले शेकडो-हजारो मेसेज वाचण्यात आणि इतरांना फॉरवर्ड करण्यात वेळ वाया घालवण्याला तुम्ही काय म्हणाल? इन्स्टाग्रामवर आलेले चटकदार रील्स एकामागोमाग एक बघत टाइमपास करण्याला तुम्ही काय म्हणाल? फेसबुकवर फेरफटका मारणं वगैरे सगळे प्रकार व्यसनातच मोडतात.
एक छोटीशी गोष्ट सांगतो. दोन संन्यासी पोहत नदी पार करत होते. त्या वेळी एका साधूला लांबून नदीमधे एक घोंगडी वाहताना दिसली. तो दुसऱयाला म्हणाला, मी चटकन पोहत जातो आणि ती घोंगडी घेऊन येतो. त्यावर पहिला संन्यासी म्हणाला, “अरे, आता तर हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. घोंगडीची आवश्यकताच काय? त्यातून आपण संन्यासी. आपण अशा गोष्टींचा मोह…’’ पहिला बोलतच होता. तोवर दुसऱयाने आपली दिशा बदलून तो ती घोंगडी घ्यायला गेलाच. पण थोडय़ा वेळाने तो “वाचवा वाचवा’’ असं किंचाळताना पहिल्या साधूने ऐकलं. वास्तवात तो साधू घोंगडी म्हणून ज्याच्या दिशेने पोहत गेला होता ते एक रानटी अस्वल होतं. त्या साधूच्या किंकाळ्या ऐकून पहिला साधू ओरडून म्हणाला, “अरे, किंचाळतोस कशाला? सोडून दे ती घोंगडी.’’ त्यावर तो दुसरा साधू म्हणाला, “मी ती घोंगडी कधीच सोडून दिलीय, पण आता या घोंगडीनेच मला घट्ट धरलंय.’’ आपल्या सर्वसामान्यांच्या बाबतीतही असंच होतं, नाही का? म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणतात…
विषया विनिवन्तते निराहारस्य देहिन।
रसवर्ज रसोप्यस्य परं दृष्टवा निवर्तते ।।59।।
भावार्थ ः इंद्रिय विषयांचे भोग न घेणाऱया माणसांचे विषय सुटतात, पण त्याच्या मनातील विषयोपभोगाची आवड मात्र नाहीशी होत नाही. त्याला ज्या वेळी ब्रह्मानंदाचा अनुभव येतो, त्याच वेळी त्याची विषयातील गोडी नाहीशी होते.
या श्लोकामध्ये ‘निराहारस्य देहिन’ असे शब्द वापरले आहेत. या ठिकाणी आहार म्हणजे केवळ खाणं-पिणं नाही, तर मागे उल्लेख केलेल्या पंचज्ञानेंद्रियांना ( डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा) या पाचही इंद्रियांना जे जे अनुकूल वाटतं, जे जे आवडतं, ज्याची चटक लागू शकते ती वस्तू, ती गोष्ट म्हणजे आहार. मोबाइलवर एकामागोमाग एक इन्स्टाग्रामवरचे रील्स बघावेसे वाटतात. हा झाला डोळ्यांचा आहार. अशा प्रकारचा निराहार हा केवळ तात्पुरता असतो. जरी त्या वेळी माणूस निराहारी असला तरीही त्याच्या मनात मात्र त्या उपभोगाबद्दल उत्सुकता आणि आकर्षण असतंच असतं. म्हणूच अशा प्रकारच्या बाह्य बंधनामुळे बाळगलेल्या संयमाला काहीही अर्थ नसतो. याच श्लोकात पुढच्याच ओळीत भगवान म्हणतात, “परम् दृष्ट्वा निवर्तते…’’ परमतत्त्वाचा किंवा परब्रह्माचा अनुभव आला की, मात्र हे सगळे रस नाहीसे होतात. हे परमतत्त्व किंवा परब्रह्म म्हणजे नेमकं काय? तरुणपणी पैसा कमावणं आणि शरीराचे भोग हवेहवेसे वाटतात. पण एका विशिष्ट कालावधीनंतर केवळ पैसा कमावणं आणि शारीरिक सुखोपभोगाने हवा तो आनंद मिळत नाही. काही विशिष्ट कालापर्यंत आपल्या आजूबाजूच्या सर्वसामान्य मित्रमैत्रिणी हव्याहव्याशा वाटतात. त्यांच्यात आपला जीव रमतो, पण जेव्हा आपली ओळख समाजातील उच्च स्तरातील व्यक्तींशी होते, ज्ञानसंपन्न आणि संस्कारक्षम व्यक्तींच्या संपर्कात येतो, त्या वेळी आपल्याला स्वतलाच जाणीव होते. परमतत्त्व किंवा परब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आज ज्यात क्षणभंगुर ‘सुख’ वाटतंय त्याहून अधिक उच्च दर्जाचा ‘आनंद’ देणाऱया वस्तू किंवा व्यक्ती. इथे मी मुद्दाम ‘सुख’ आणि ‘आनंद’ असे दोन वेगवेगळे शब्द वापरले आहेत. सुख वेगळं. आनंद वेगळा. सुखाच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे दुःख. आनंदाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द शोधून दाखवा.
सुख हे कुणा व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या असण्यावर अवलंबून असतं, तर आनंद हा त्या वस्तू किंवा व्यक्तींच्या सहवासातून निर्माण होणारा आत्मानुभव असतो. उदाहरण द्यायचं झालं तर दारू पिण्यातून मिळणारं सुख. नशा उतरली की, ते सुख संपून जातं. ती नशा पुन्हा अनुभवण्यासाठी पुन्हा दारू प्यावीशी वाटते. जो प्रकार दारूच्या बाबतीत तोच प्रकार कोणत्याही व्यसनाच्या बाबतीत लागू होतो. सुखाच्या उपभोगाने निर्माण होणारे रस पुढे अनेक विकार निर्माण करतात. हे विकार काही वेळा शारीरिक असतात, तर बहुतेक वेळा ते मानसिक असतात. रोग, शारीरिक व्याधींच्या जोडीनं भय, उद्वेग, चिंता आणि मानसिक तणाव (ज्याला इंग्रजीत अँझायटी आणि स्ट्रेस म्हणतात), औदासीन्य, खिन्नता, नैराश्य… सुखाच्या मागोमाग दुःख येतंच येतं. कोणत्याही सुखाच्या बाबतीत थोडय़ाफार फरकाने हाच अनुभव येतो. सुख अनेकदा तत्कालीन म्हणजे क्षणिकच असतं. सुख मिळवताना केलेल्या भरकट कृतींतून पुढे काही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यानंतर आत्मग्लानी म्हणजे ज्याला इंग्रजीत गिल्ट फीलिंग म्हणतात ती येण्याची शक्यता असते. पण… पण आनंदाच्या बाबतीत कधीच पश्चात्ताप करावा लागत नाही. कारण आनंद मिळवण्यासाठी केलेल्या सर्व कृती बुद्धी स्थिर ठेवून, समजून-उमजून केलेल्या असतात. अशा प्रकारे बुद्धी स्थिर ठेवून कृती करणं हे स्थितप्रज्ञाचं आणखी एक लक्षण आहे, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात.