
मीरा-भाईंदरमध्ये मिंधे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कामामुळे महायुती सरकार बदनाम होत असल्याने त्याविरोधात नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना लेखी तक्रार करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या लेटर बॉम्बमुळे मिंधे गटाने थयथयाट केला असून जैन यांनी 72 तासांत माफी मागावी अन्यथा 10 कोटी रुपयांचा मानहाणीचा दावा दाखल करू अशी नोटीस दिली आहे. दरम्यान सरनाईक यांनीही खुशाल माझी चौकशी करा असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
अवकाळी पावसाने मीरा-भाईंदरमधील मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. त्यात सुखी मासळी व बोटींचे नुकसान झाले आहे. नालेसफाई न झाल्यामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. खड्डे दुरुस्ती झालेली नाही. सिमेंट रस्ते अर्धवट आहेत. मात्र या सर्वांचे भाजप आणि मिंधे गटाला काहीही पडलेले नाही.
मीरा-भाईंदरमध्ये मिंधे व भाजप गटात काहीच आलबेल नाही. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी पदाधिकारी सोडत नाहीत. भाजप आणि मिंधेंचे आपापसातले हेवेदावे आणि भ्रष्ट कारभारामुळे मीरा-भाईंदरचा विकास मात्र ठप्प झाला आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून एकमेकांची उणीदुणी काढण्यात पदाधिकारी व्यस्त आहेत.
सरनाईकांची पोलखोल
प्रताप सरनाईकांनी वरसावे, घोडबंदर, काजूपाडा व चेना परिसरात जमिनी खरेदी करून शासनाचा 150 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. तसेच तिथे ताब्यात नसलेल्या रस्त्यापोटी पालिकेला 29 कोटी रुपये देण्यास भाग पाडले. शेकडो
झाडांची कत्तल करून ईको सेन्सेटिव्ह झोनमध्ये बांधकामे केली आहेत. सरनाईक यांच्या बेकायदा कामामुळे सरकारची बदनामी होत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी केला आहे.
जैन यांना नोटीस
मिंधे गटाचे वकील राजदेव पाल यांनी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांना नोटीस पाठवली आहे. जैन यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेले सरनाईक यांच्यावरील आरोपाचे पत्र मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा 10 कोटींचा दावा दाखल करू असा इशारा दिला आहे. शिवाय भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची मागणीही मिंधे गटाने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.