
भाजपा महायुती सरकारने आपल्या ‘मुंबई विका’ योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेवरील प्रशासकाच्या माध्यमातून पालिकेच्या घनकचरा विभागाच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. या विभागात काम करत असलेल्या 32 हजार सफाई कामगारांना उद्ध्वस्त करून हा प्रकल्प आपल्या लाडक्या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार वर्षांपासून झालेल्या नसल्याने सर्व कारभार प्रशासनच चालवत आहे. महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. भाजपा महायुती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी वसुलीसाठी मुंबईतील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा सेवा प्रकल्प कंत्राटदारांना देण्याचे काम करत असून मुंबईतील कष्टकरी कामगारांना, जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली.
सार्वजनिक सेवांच्या खासगीकरणाला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुंबईतील सार्वजनिक सेवांचे खासगीकरण करण्याचा उद्योग थांबवावा, अशी मागणी राजहंस यांनी केली.