
मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमधून प्रवासी खाली पडण्याचे प्रमाण गंभीर आहे. लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरताहेत हे चिंताजनक असल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रेल्वेचा समाचार घेतला. उच्च न्यायालयाने मुंब्रा येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीव्र चिंता व्यक्त करत अपघाताचे सत्र रोखण्यासाठी लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचनाही यावेळी केली. उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही यावर न्यायालय देखरेख ठेवेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
9 जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या गेटवरील 13 प्रवासी खाली पडले. दुर्घटनेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर याआधीच जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने मुंब्रा येथील अपघाताच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाला लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचना न्यायालयाने केली.
धावत्या गाड्यांमधून पडून लोक मरत आहेत. दररोज सुमारे 10 प्रवासी अपघातात मरतात. तुमच्या स्वतःच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. यावरून तुम्ही जे काही उपाय केले आहेत ते पुरेसे नाहीत, असे दिसते. ही परिस्थिती चिंताजनक आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती मारणे यांनी केली.
वेळोवेळी प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत आणि ९ जूनच्या घटनेनंतर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असे रेल्वेकडून बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले. तसेच विविध उपाययोजनांकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. मात्र खंडपीठाने त्यावर असमाधान व्यक्त करत लवकरात लवकर लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची सूचना केली.