
गेली काही वर्षे सुरु असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा टीआरपी अचानक कमी झाल्यामुळे, सूत्रसंचालक नीलेश साबळे याला डच्चू देण्यात आलेला आहे. येत्या काही दिवसांमध्येच आता अभिजीत खांडकेकर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिग्दर्शनापासून सूत्रसंचालनापर्यंतची सर्व जबाबदारी नीलेश साबळे सांभाळत होता, परंतु आता नीलेश साबळेच्या जागी ‘चला हवा येऊ द्या- 2’ मध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
नीलेश साबळे याला काढल्यानंतर, सोशल मीडियावरही ही चर्चा जोरदार रंगु लागली होती. त्यातच आता राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी नीलेशला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. फेसबुकवर शरद उपाध्ये यांनी पत्र लिहीत, नीलेश साबळे यांनी त्यांना कसे वागवले होते, याचा अनुभव फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडला आहे. काही वर्षांपूर्वी शरद उपाध्ये यांनी चला हवा येऊ द्या च्या सेटवर हजेरी लावली होती. या सेटवर ते गेले असताना, शरद उपाध्ये यांना आलेला अनुभव त्यांनी या पत्राच्या माध्यमातून सांगितला आहे.
शरद उपाध्ये यांना सेटवर बराच वेळ बसवण्यात आले होते. तसेच त्यांची साधी पाण्याची विचारपूसही कोणी केली नव्हती. तसेच सेटवर त्यांना देण्यात आलेली वागणूकही फार विचित्र असल्याचे उपाध्ये यांनी म्हटले आहे. उपाध्ये यांनी पत्राच्या माध्यमातून एकूणच नीलेश साबळे यांच्यावर खरमरीत शब्दात निशाणा साधला आहे.