
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून घणसोली विभागात सुरू असलेल्या अनेक विकासकामांची लटकंती झाली आहे. पावसाळा सुरू झाला तरी पावसाळापूर्वीची कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीत. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विभाग कार्यालयावर धडक देऊन विभाग अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.
घणसोली गाव आणि परिसरात अनेक ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. रस्त्यावरील खड्डे, अनधिकृत फेरीवाले, नालेसफाई, उघडी गटारे, घनकचरा, स्ट्रीट लाईट, पार्किंग या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेच्या या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी घणसोली विभाग कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख आत्माराम सणस, उपशहरप्रमुख मंगेश साळवी तानाजी सूर्यवंशी, उपजिल्हा संघटक सुप्रिया लाड, शहर संघटक मंजुळा म्हात्रे, विधानसभा संघटक स्मिता लोंढे, शहर युवाधिकारी सचिन आसबे, उपशहर संघटक सुरेखा साळेकर, विभागप्रमुख सखाराम सुर्वे, प्रेमनाथ म्हात्रे, अशोक जाधव, भरत चव्हाण, नीलेश शेलार आदी उपस्थित होते.
…तर तीव्र आंदोलन छेडू
घणसोली विभाग हा नागरी संमस्यांचे आगार बनला आहे. या विभागात अनधिकृत बांधकामांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. पावसाळापूर्वीची कामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांना अनके अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या सर्व समस्या येत्या पंधरवड्यात मार्गी लागल्या नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी दिला आहे.