
दुष्काळी जनतेला पाणी देण्यासाठी तीन दशके अखंड चालणारी पाणी संघर्ष चळवळ शेवटच्या घटकाला पाणी दिल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा देत शेटफळे (ता. आटपाडी) येथे 33व्या पाणी संघर्ष परिषदेत टेंभू योजनेला ‘पद्मभूषण डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी’ यांचे नाव देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. ही परिषद फक्त ठरावापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती पुढील संघर्षाचे रणशिंग फुंकणारी ठरली. प्रा. शिवाजीराव काळुंगे अध्यक्षस्थानी होते, तर चळवळीचे संयोजक वैभव नायकवडी यांनी लढय़ाच्या पुढील टप्प्याचे संकेत दिले.
शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार वैभव नायकवडी यांनी केला. योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेला विलंब, निधीअभावी रखडलेली कामे आणि अजूनही पाण्यापासून वंचित असलेल्या गावांचा उल्लेख करत त्यांनी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. प्रा. काळुंगे म्हणाले, डॉ. नायकवडी यांनी स्वतःच्या बागायतीचा पाण्याचा हक्क सोडून तेरा तालुक्यांसाठी संघर्ष केला. टेंभू योजनेला त्यांचे नाव देणे, ही त्यांच्या कार्याची कृतज्ञतेने झालेली नोंद असेल.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष झाला आहे. टेंभू योजनेचे मागील आवर्तन उशिरा आले, शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ता म्हणून या लढय़ाला साथ देणारच, असा निर्धार व्यक्त केला. या परिषदेत 20 महत्त्वाचे ठराव संमत झाले असून, ते शासन दरबारी सादर होणार आहेत. यावेळी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, डॉ. सयाजीराजे मोकाशी, बाळासाहेब नायकवडी, सुभाष पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, गौरव नायकवडी, आनंदराव पाटील, विष्णुपंत पाटील, चंद्रकांत गायकवाड, पतंगराव गायकवाड, सावंता पुसावळे आदी मान्यवर उपस्थित होते.