
बकरी ईददिवशी कल्याणचे किल्ले दुर्गाडीवरील दुर्गादेवीचे मंदिर बंद ठेवले जाते. पोलिसांच्या या कृतीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आक्षेप घेतला आहे. उपनेते विजय साळवी यांनी बकरी ईददिवशी दुर्गादेवी मंदिर बंद ठेवू नये, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.
शिवसेनाप्रमुखांनी बंदीहुकूम मोडून घेतले दर्शन
1972 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बंदीहुकूम मोडून श्री दुर्गादेवीचे दर्शन घेतले आणि दर्शनासाठी मंदिर खुले केले. तेव्हापासून श्री दुगदिवीचा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. किल्याच्या एका बाजूला इदगाह आहे. त्यामुळे मुस्लीम समाज बकरी ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नमाज पढतात. बकरी ईदच्या दिवशी नमाजाच्या वेळी श्री दुर्गादेवीचे मंदिर बंद केले जाते. पोलिसांकडून भक्तांना दर्शन घेण्यास अडवले जाते. पोलीस प्रशासन दुर्गादेवी भक्तांवर अन्याय करते. त्यावेळी सुरक्षा कारणास्तव पोलीस प्रशासन मंदिर बंद ठेवत असल्याचे सांगतात. मात्र या निर्णयामुळे श्री दुर्गादेवी भक्तांना देवीचे दर्शन घेता येत नाही. तसेच मंदिरातील पवित्र घंटा कपड्याने झाकण्यात येतात हे हिंदूंवर अन्यायकारक असल्याचे साळवी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मिंधे गट निर्लज्ज
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मंदिर बंदीच्या विरोधात उघडपणे दर्शन घेत मंदिर खुले केले होते. पुढे धर्मवीर आनंद दिघे यांनी ‘घंटानाद आंदोलन’ सुरू करून पोलिसांच्या बंदी आदेशाला विरोध केला. आपण मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्रीपदावर असतानाही आपल्या गटाकडून निर्लज्जपणे घंटानाद आंदोलन केले जाते. हे आंदोलन कोणाविरोधात केले जात आहे? तसेच जर आपले पद आणि सत्ता हिंदूंच्या हक्कांचे रक्षण करू शकत नसेल तर ते हिंदुत्व बेगडी ठरेल, अशी तीव्र टीका विजय साळवी यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे आपण जर खरे हिंदुत्ववादी आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे अनुयायी असाल तर हिंदूंवरील अन्याय थांबवायला हवा. – विजय साळवी, उपनेते