
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात असे म्हटले जात आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्च 2026 पर्यंत 500 रुपयांच्या नोटा बंद करणार आहे. या दाव्यात असेही सांगितले जात आहे की, आरबीआय ने बँकांना त्यांच्या एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मार्च 2026 नंतर 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होतील. हा दावा एका यूट्यूब चॅनेल ‘कॅपिटल टीव्ही’वर (capitaltvind) प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र या दाव्याची सत्यता तपासली असता तो पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले आहे.
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक युनिटने या दाव्याला स्पष्टपणे खोडून काढले आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर स्पष्ट केले आहे की, आरबीआयने 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याबाबत कोणतीही घोषणा किंवा अधिसूचना जारी केलेली नाही. 500 रुपयांच्या नोटा कायदेशीर चलन (लीगल टेंडर) म्हणून पूर्णपणे वैध आहेत आणि त्यांचा वापर सुरू राहील. याशिवाय आरबीआयने बँकांना 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु याचा अर्थ 500 रुपयांच्या नोटा बंद होणार, असा होत नाही. हे निर्देश केवळ लहान मूल्यांच्या नोटांचा वापर वाढवण्यासाठी आणि चलन व्यवस्थापन सुधारण्यासाठी देण्यात आले आहेत, असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, नोव्हेंबर 2016 मध्ये केंद्र सरकारने 500 आणि 1,000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना ही माहिती जाहीर केली होती आणि आरबीआय ने नवीन 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या. मे 2023 मध्ये आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून हळूहळू काढून घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या अजूनही कायदेशीर चलन म्हणून वैध आहेत. या पार्श्वभूमीवर जर 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला असता, तर आरबीआय किंवा सरकारकडून याबाबत अधिकृत अधिसूचना किंवा घोषणा केली गेली असती.