पुण्यात अजित पवारांच्या भाषणावेळी गोंधळ; शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यात शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमावेळी अजित पवार यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या घोषणा देत गोंधळ घातला. अजित पवार भाषणाला उभे राहताच शेतकरी, महिला आक्रमक झाले आणि कर्जमाफीवरून जाब विचारू लागले. यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सभागृहाच्या बाहेर काढले.

उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात भाषण करत असताना अमरावतीहून आलेल्या प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी कर्जमाफी आणि बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यांवरून घोषणाबाजी केली. यावेळी अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाल्याची म्हटले. त्यानंतरही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सभागृहाबाहेर काढले. यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.