
जामखेड तालुक्यातील दिघोळ परिसरातील ब्राह्मणवाडी, दगडेवस्ती, उमाप वस्तीवरील शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. लवकरात लवकर नदीवर पूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जामखेड तालुक्यातील दिघोळ जवळून वांजरा नदी वाहते. पुढे तिचे नाव मांजरा आहे. नंतर हीच नदी गोदावरी नदीला मिळते. नदीच्या एका बाजूने दिघोळ व दिघोळ गावातील ब्राह्मणवाडी, दगडेवस्ती, उमाप वस्ती हे दुसऱ्या बाजूला आहे. या ठिकाणी सुमारे पाचशे लोकवस्ती आहे. येथील शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना दिघोळला ये-जा करण्यासाठी एकतर बीड जिल्ह्यातील पांचग्री मार्गी बारा किलोमीटर अंतरावरून ये-जा करावी लागते किंवा नदीवर प्लॅस्टिक पिंपाच्या साहाय्याने
केलेल्या तराफावरून शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते.
यावर्षी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे गावात पाणी आले होते तसेच दोन मृतदेहही वाहून आले होते. नदीवर पूल नसल्यामुळे ब्राह्मणवाडी, दगडेवस्ती, उमापवस्तीवरील नागरिकांचे हाल होत आहेत. दुधवाले शेतकरी शालेय विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करावी लागते. यामुळे नदीवर पूल करावा, अशी मागणी सभापती प्रा. राम शिंदे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. पूरपरिस्थिती पाहण्यासाठी ते आले होते, तेव्हा त्यांनी हे वास्तव पाहिले आहे. तरी लवकर प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यावेळी केशव (अण्णा) वनवे, संजीवनी पाटील, मनोज राजगुरू, सरपंच सविता संतोष शिंदे, उपसरपंच दशरथ राजगुरू, बाजीराव गोपाळघरे, धीरज रसाळ, सूरज रसाळ, वैजिनाथ गीते, मच्छिंद्र गीते, महालिंग महादेव दगडे, बाळासाहेब दगडे, हनुमान फुने, रमेश दगडे, बालाजी उमाप, सोमिनाथ दगडे, दत्तात्रय गीते उपस्थित होते.




























































