
गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच संपूर्ण राज्याला कळाले पाहिजे की फडणवीसांनी काय लायकीचे मंत्री मंत्रिमंडळात ठेवले आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजप आणि शिंदे गटाच्या लोकांचा दुसरे पक्ष फोडण्याचा एकच अजेंडा आहे. ते आपापल्या मंत्रालयातली कामं करत आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे. मोठी मिन्नतवारी करून त्यांना मंत्रालयात घेतले आहे अशी माहिती आहे माझ्याकडे. त्यांना मंत्रीपदावर घ्यायला केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर प्रकरणं आहेत. गिरीश महाजन यांच्या मंत्रालयात अभिषेक कौल कोण आहेत? हा एक ठेकेदार आणि बिल्डर आहे, तो महाजन यांच्या कार्यालयात बसतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन आपत्ती व्यवस्थापनाची एकही फाईल मंजूर करत नाही. कौलकडे सर्व पैसे जमा होतात. आपत्ती व्यवस्थापन हे खातं सर्वसामान्यांशी संबंधित खातं आहे, साडे तीनशे फाईल हे महाजन यांच्या खात्यात पडून आहेत कारण त्यांचे व्यवहार बाकी आहेत. गिरीश महाजन यांनी अभिषेक कौल हा ठेकेदार आणि बिल्डर नेमलेला आहे, हा कौल सगळे व्यवहार करतो. फडणवीसांनी हे लक्षात घ्यावं. फडणवीसांनी याचे पुरावे मागावे मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही कारवाई करणार नाही हे मला माहित आहे. पण संपूर्ण राज्याला कळाले पाहिजे की फडणवीसांनी काय लायकीचे मंत्री मंत्रिमंडळात ठेवले आहेत. फडणवीसांनी जे साधु संतांच महामंडळ जमा केलं आहे, त्यातले एक साधु संत हे गिरीश महाजन आहेत. काल कुंभमेळा निमित्त जी बैठक झाली आणि ते साधु संतांचे चरण स्पर्श करत होते त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल पटेल या ईड़ी पीडित साधू संतांच्या पाया पडायला हवं. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला. नाहीतर त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सर्वाधिक भ्रष्ट मंत्री आहेत. अभिषेक कौल या व्यक्तीच्या मंजुरीशिवाय किंवा त्याने एखाद्या फाईला व्यवहार पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन आणि पुर्नवसन हे महत्त्वाचे विषय या खात्यातली परिस्थिती आहे. जिथे सामान्य लोकांच्या आयुष्याचा प्रश्न येतो तिथे महाजन मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात. अशा व्यक्तीने पक्ष फोडीचा विचार करावा यात सगळं आलं.
तसेच देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात किंवा दुर्लक्ष करतात. अंदाज समितीच्या पीएनेच भ्रष्टाचार केला. आम्ही आणलेल्या दबावामुळे गुन्हा दाखल करवा लागला. अंदाज समितीच्या चेअरमनच्या पीएकडे 15 कोटी रुपयांचा नजराणा शासकीय वास्तूत जमा झाली, फडणवीस तुम्ही कुणाशी खोटं बोलताय? या मंत्रालयातली फाईल वजन ठेवल्या शिवाय हलत नाही. गिरीश महाजनांच्या 350 फाईल्सचे पुरावे आम्ही देऊ, किरीट सोमय्यांकडे आम्ही देऊ विचारा ते कुठे आहेत?
कुर्ल्यातली मदर डेअरची जागा अदानीला देण्यात आली आहे. हा सुद्धा मुंबईतला सगळ्यात मोठा भुखंडाचा घोटाळा आहे. धारावीच्या नावाखाली 17 हेक्टर जनीन अदानीच्या घशात चालली आहे. यावर सगळ्यात आधी उद्धव ठाकरे, शिवसेनेना आवाज उठवला, मोर्चे काढले. मुंबईतला प्रत्येक मोकळा भुखंड हा धारावीच्या नावाखाली गौतम अदानीला देणं हा सुद्धा फडणवीस करत असलेला भ्रष्ट्राचार आहे. आणि त्या भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदी मोदींची साथ आहे. धारावीचा भूखंड एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये धारावीच्या रहिवाशांचे पुनर्वसन होऊ शकतं. त्याच्यामध्ये त्यांची जी काही गुंतवणूक आहे ती त्यातून निघू शकते. पण त्यांना वडाळ्याची मिठागरं, डम्पिंग ग्राऊंड, मदर डेअरीची जागा आणि महानंद डेअरीची जागा हवी आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे मुंबईतल्या सर्व मराठी माणसांच्या जागा गौतम अदानीला देत आहेत. स्वतःला मराठी माणसाचे तारणहार मानणाऱ्या एकनाथ शिंदे यांना जर थोडी तरी लाज असेल तर त्यांनी या मुंबईच्या लुटीविरोधात बोललं पाहिजे. अदानी जी लूट करतायत त्याचा किती वाटा भाजपच्या तिजोरीत जाणार हे भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत कळेल ना तुम्हाला. विषय धारावीच्या पुनर्वसनाचा आहे. पुनर्वसन हे जिथे झोपडपट्ट्या आहेत तिथेच केलं जातं आणि त्यासाठी त्यांना ज्यादा एफएसआय दिला जातो. त्या राज्यामध्ये भूखंडाच्या भूखंड त्याच्या घशात कोणी घातल्याचे मला दिसत नाही. ही पहिल्यांदाच होत आहे की, या जगातली एका वसाहतीच्या पुनर्वसनासाठी अख्खी मुंबई घशात घातली जाते. उद्या या मुंबा देवीचे नाव सुद्धा अदानीच्या नावाने केलं जाईल आणि तसा प्रस्ताव स्वतः फडणवीस आणतील आणि त्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे हे असा शिक्का मारतील असेही संजय राऊत म्हणाले.