महाभ्रष्ट भाजप महायुतीने मुंबई डुबवली, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

पहिल्याच पावसात मुंबईकरांचे हाल होण्यास महापालिका व राज्य सरकारच जबाबदार असून नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले? महाभ्रष्ट भाजप महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली, असा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

मुंबई महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते, पण दरवर्षी पहिले पाढे 55 असे चित्र दिसते. जनतेचा पैशावर कंत्राटदार व सत्ताधारी यांनी डल्ला मारून खिसे भरल्यानेच मुंबईकरांचे हे हाल होत आहेत. मुंबईला लुटणाऱ्या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाही. एका पावसाने भाजप-शिंदे सेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

मुंबईकरांच्या कराच्या पैशावर डल्ला

मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात रस्ते व वाहतूक विभागासाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तर सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर 5545 कोटींची तरतूद केलेली आहे. 2024 मध्ये नालेसफाईसाठी 249.27 कोटी रुपये खर्च केले तर 2025 मध्ये नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी 395 कोटी रुपये खर्च केले. यासाठी 31 कंत्राटदारांना काम दिले, पण एवढा पैसा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाई झाली नाही तर हातसफाई करून मुंबईच्या तिजोरीमधील मुंबईकरांच्या कराच्या पैशावर डल्ला मारला आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.