
मेअखेर धुमशान घातल्यानंतर विश्रांती घेणारा मान्सून आता चांगलाच सक्रिय झाला असून उद्यापासून मुंबई-कोकणासह राज्याच्या अनेक भागात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, देवगडमध्ये आज ढगफुटी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते आणि शेती पाण्याखाली गेल्याने नागरिक हवालदिल झाले. हीच स्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याने कोकणवासीयांची चिंता वाढली आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवडय़ानंतर कोकण-महाराष्ट्रात येणाऱया पावसाने यावर्षी मेअखेरीस इंट्री करून जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पावसामुळे मुंबईसह राज्याच्या विविध भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. यानंतर गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मान्सून आता दक्षिण पूर्व मध्य प्रदेश ते हरियाणा, आंध्र किनारपट्टीपासून ओडिशा आणि छत्तीसगड दिशेने पुढे सरकत आहे. या स्थितीमुळे मान्सूनला पूरक वातावरण निर्माण झाल्यामुळे अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
n देवगडमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 224 मिमी पाऊस झाल्याने प्रमुख रस्त्यांसह बहुतांशी शेती पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवगडमध्ये आतापर्यंत 733 मिमी पाऊस झाला आहे. या वादळी पावसामुळे झाडे आणि घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मीठमुंबरी, कोटकामते, खुडी, वाडा, नारिंग्रे, मिठबाव, हिंदळे, बापर्डे, तिर्लोट, पुरळ आदी भागात पावसाचा जोर सर्वाधिक होता.