
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. त्याला हिंदुस्थानच्या कसोटी आणि वन डे संघातही स्थान मिळालेले नाही. आता हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेसाठीही त्याच्या नावाचा विचार झाला नाही. याबाबत आता कर्णधार शुभमन गिल याने भाष्य केले असून त्याने केलेल्या विधानामुळे शमीच्या कारकिर्दीला कायमचाच फुलस्टॉप लागल्याची चर्चा रंगू लागली आहे.
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात शुक्रवारपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या लढतीआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार शुभमन गिल याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कसोटी संघात स्थान का मिळत नाही याचे उत्तर दिले.
मोहम्मद शमीसारखी क्वालिटी असणारे गोलंदाज जास्त नाहीत. परंतु आम्ही आकाशदीप आणि प्रसिध कृष्णा सारख्या खेळाडूंच्या कामगिरीकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. बुमराह आणि सिराजही चांगली कामगिरी करत आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट आम्ही पुढची मालिका कुठे खेळणार आहोत आणि शमी संघात का नाही याचे चांगले उत्तर निवडकर्तेच देऊ शकतील, असे गिल म्हणाला.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणे सोपे नाही. दक्षिण आफ्रिकेने या वर्षाच्या सुरुवातीलाच लॉर्ड्स मैदानावर झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब जिंकला होता. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने ही दोन कसोटी सामन्यांची मालिका महत्त्वपूर्ण असणार आहे, असे गिल म्हणाला.
कोलकातामध्ये खेळणे खास असून या शहराशी माझे भावनिक नाते आहे. इथूनच माझ्या आयपीएल कारकिर्दीचा शुभारंभ झाला होता. इथे मला पंजाबसारखेच वाटते. सहा वर्षांपूर्वीही मी टीमचा सदस्य होतो, पण मला सामना खेळायची संधी मिळाली नव्हती. त्यावेळी इथे गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळला होता. मात्र आता मी कर्णधार म्हणून मैदानात उतरून हा खास क्षण असल्याचेही गिल म्हणाले.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे 12 वाजणार, पुढील हंगामापासून 12 कसोटी संघांना सामावून घेण्याचा प्रस्ताव




























































