
लखनौमध्ये एका निरोप समारंभातून परतणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आपल्या भरधाव कारवरील नियंत्रण गमावल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका सहा वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला असून इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गौरव सिंग असे 21 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव सिंग गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास आपल्या मित्रासह फेअरवेल पार्टीवरून घरी परतत होता. लखनौच्या एका वर्दळीच्या रस्त्यावर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने सुरुवातीला रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या दृश्यांनुसार, कारने एका व्यक्तीला धडक दिली ज्यामुळे तो जमिनीवर फेकला गेला. त्यानंतर ही अनियंत्रित कार रस्त्यावरून उलटली आणि तिथून चालत जाणाऱ्या चार पादचाऱ्यांना चिरडले. यामध्ये अरमान, साधना पटेल, त्यांची आई मीना देवी आणि साधनाचा सहा वर्षांचा मुलगा दिशांत यांचा समावेश होता. एवढ्यावरच न थांबता या कारने पुढे एका ई-रिक्षा आणि ऑटोरिक्षालाही धडक दिली, ज्यामध्ये ई-रिक्षा चालक अवध बिहारी जखमी झाले.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी पळापळ आणि गोंधळ निर्माण झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कार इतक्या वेगात होती की लोकांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धाव घेतली. अपघातानंतर आरोपी विद्यार्थी आणि त्याचा मित्र आपली अपघातग्रस्त कार घटनास्थळी सोडून पसार झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना पाचारण केले. केंद्रीय विद्यालयात इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या दिशांतला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लखनौचे एसीपी रजनीश वर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कार जप्त केली आहे. जखमींच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करत आहेत. पीडितांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


























































