महाराष्ट्रातील बदलते राजकारण; महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराच्या इतिहासाला सूडाच्या राजकारणाने कलंक

स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानी राजकारणाचा आणि राजकीय विकास यांचा विचार करणे आज आवश्यक आहे. हिंदुस्थानच्या राजकारणात महाराष्ट्राची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. महाराष्ट्राने अनेक पेचप्रसंगावर आजपर्यंत मात केली आहे. तीव्र संघर्ष करुन मराठी भाषिकांनी ‘सयुंक्त महाराष्ट्र’ मिळवला आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्याने सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीत परिवर्तन झाल्याने राजकीय पक्षांमध्ये प्रचंड घडामोडी घडल्या व त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण बदलले आहे.

महाराष्ट्राची निर्मिती 1960 साली झाली. अनेक महापुरुषांनी केलेले जनआंदोलने, चळवळीमुळे लोकांमध्ये जनजागृती झाली. सत्ता स्पर्धेला विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच लोकशाहीवादी परिणाम मिळाले. तसचे राजकारणाचे सामाजिक चारित्र्य बहुजातीय बनले. 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण दिल्याने त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. राजकारणात होणाऱ्या बदलाबरोबर विविध समाजघटकांचे परस्पर संबंध राष्ट्रीय कल यातही बदल होत असल्याचे दिसते.

राजकारणात पक्ष संघटना महत्वाचे काम करते. लोकांच्या मनात त्याच्या न्याय हक्कांविषयी जागृती करणे, त्यांचे मागण्यात रुपांतर करत त्याची क्रमवारी लावून त्याला निवडणूकीसारख्या माध्यमातून समाज मान्यता मिळवून देणे हे काम राजकीय पक्ष करतात. पक्षांर्गत गटबाजी व त्याचे परस्पर काटशाह हा पक्ष पद्धतीचा स्थायीभाव आहे. 2009 च्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उलथापालथ झालेली दिसते. निवडणूकीपुर्वी झालेल्या युती निवडणूकीच्या निकालानंतर टिकू शकला नाही. जागावाटपारून पक्षामध्ये फूट, युतीमध्ये तूट व नवीन पक्षांची समीकरणे महाराष्ट्रात उद्याला आली. या गोष्टीला 2 वर्ष होत असताना महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी मुल्यहीन राजकारण केल्याचे पहायला मिळते. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पक्ष आणि चिन्ह व पक्षाचे अस्तित्व प्रश्नांकित करणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडल्या.

2024 च्या निवडणूकीत महाराष्ट्रात प्रचंड अस्थिरता, अनिश्चतता निर्माण झाली होती. महाराष्टाच्या पुरागोमी विचाराच्या इतिहासाला सुडाच्या राजकारणाने कंलक लावण्याचे काम केले गेले. लोकशाहीत केवळ आर्थिक विकासावर लक्ष ठेवून चालत नाही. महाराष्ट्राची मुळ विचाराधारा ही धर्मनिरपेक्ष राजकारणाची आहे. सामाजिक विकासाच्या धोरणावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. जो राजकीय पक्ष धर्मनिरपेक्ष नसतो त्याची सामान्य लोकांशी नाळ कधीच जोडली जात नाही.

महाराष्ट्राची मूळ विचारधारा धार्मिक राजकारणामुळे सध्या लयास गेली. महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात विकास, उद्योग, शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्यावर निवडणुका होत होत्या. तोच काळ पुन्हा येण्याची गरज आहे. महाराष्ट्रात विविध पक्ष सत्तेत असल्याने आर्थिक विकास सामाजिक न्यायाबद्दल धोरणातील विविधता महाराष्ट्रात नवीन प्रश्न निर्माण करीत आहेत. राज्य कारभार निर्विवादपणे व यशस्वीरित्या हीच एक गोष्ट आज पेचात सापडलेली दिसते. पूर्वी महाराष्ट्रात लोकशाहीचे व राजकारणातील विचारांचे आदर्श देशपातळीवर दिले जायचे. सध्या जरी तशी परिस्थिती नसली तरी आजही सुजाण नागरिक, कार्यकर्ते, संघटना महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणावर लक्ष ठेवून आहे. ते मूल्यात्मक राजकारणाचा आग्रह धरून आहे. अशी माणसे हीच उद्याच्या बळकट महाराष्ट्राचा आधार आहे.
डॉ. आदित्य येळीकर (छत्रपती संभाजीनगर)