नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद – विजय वडेट्टीवार

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना करणार बंद, असं वक्तव्य काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली. तेव्हा मतांसाठी सरसकट निधी देण्यात आला. पण आता या योजनेतील घोटाळे समोर येत आहेत. या योजनेत पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आले. याआधी या योजनेत पारदर्शकता का नव्हती? या सरकारवर या योजनेमुळे भार पडत असल्यामुळे आता अटी शर्ती घातल्या जात आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर ही योजना सरकार बंद करणार. आता सरकार मधील मंत्री कितीही सांगत असले तरी ही योजना बंद करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “राज्यात कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. केंद्र सरकारने लावलेल्या निकषांमुळे तसेच शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याची मंजुरी आलेली नाही. त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही. हे सरकार सत्ताधारी आमदाराना पाच कोटी रुपयांचा निधी देतात मग कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसे नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वडेट्टीवार म्हणाले की, “महायुती सरकार मधील पहिल्यांदा निवडून आलेल्या ५० आमदारांना सरकारने पाच कोटीचा आमदार निधी दिला. एकीकडे आदिवासी विभाग असो किंवा मागासवर्गीय विभाग यांचा निधी वळवला जात आहे, राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. पैसे नाही सांगत सत्ताधारी आमदारांना मात्र निधीची खैरात वाटायची आणि विरोधी पक्षातील आमदारांवर अन्याय करायचे हे महायुती सरकारचे धोरण आहे. आमदार हा लोकप्रतिनिधी असल्याने हा फक्त त्यांच्यावर नाही तर जनतेवर अन्याय आहे. राज्याचा सर्वांगीण विकास होणे हे या सरकारचे धोरण नाही.”