
ठाणे-बोरिवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भुयारी करा, अशी एकमुखी मागणी पुन्हा एकदा स्थानिकांनी केली आहे. निसर्गसंपदा पाहून अनेकांनी या भागात घरे खरेदी केली. मात्र आता त्यांना मानसिक धक्का बसला आहे. दररोज येथून पन्नास हजार गाड्या जाणार असतील तर वाढणारे प्रदूषण आणि श्वसनाचे विकार नागरिकांनी का सहन करायचे, असा सवाल बैठकीत स्थानिकांनी उपस्थित केला.
अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाविरोधात नुकतेच येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी एमएमआरडीएने या भागातील अनेक वृक्ष तोडले आहेत. या मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण, वाहतूककोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे रहिवाशांनी सांगितले. हा मार्ग भुयारी मार्ग नेण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. स्थानिक नागरिकांकडून कॉसमॉस लॉज क्लब हाऊसमध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
एमएमआरडीएला जाब विचारणार
विकासाला कधीच कुणी विरोध करीत नाही. पण विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले जात असेल आणि त्यातून नागरिकांना फुप्फुसाचे आजार होणार असतील तर करायचे काय, त्यामुळे ठाणे बोरिवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भुयारी करावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह एमएमआरडीएशी लढण्यास तयार असून त्यांना जाब विचारणार असल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.