
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारने 1975 मध्ये लागू केलेल्या आणीबाणीच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘संविधान हत्या दिवस’ साजरा करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. यावर खर्गे यांनी तीव्र आक्षेप घेत, “ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणतेही योगदान दिले नाही, ते आता संविधानावर बोलत आहेत,” असा घणाघाती हल्ला चढवला.
खर्गे यांनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, “भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी आणीबाणीच्या मुद्द्याला पुन्हा नव्याने मांडून देशाचे लक्ष त्यांच्या अपयशांपासून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे.” ते म्हणाले, “मोदी आणि भाजप यांना काँग्रेसच्या ‘संविधान बचाव यात्रे’मुळे अस्वस्थता जाणवत आहे”.
पंतप्रधान मोदींवर टीका करत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विशेष संसद सत्र आणि सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली होती, पण पंतप्रधानांनी त्याऐवजी बिहारमध्ये प्रचाराला प्राधान्य दिले.” तसेच मणिपूरमधील हिंसाचारावर पंतप्रधानांचे मौन आणि तिथे भेट न देण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “पंतप्रधान परदेश दौरे करतात, पण मणिपूरला का जात नाहीत?” असा सवाल त्यांनी केला.
याशिवाय, खर्गे यांनी माध्यम स्वातंत्र्य आणि न्यायपालिकेच्या स्वायत्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मोदी प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, पत्रकार परिषदा घेत नाहीत. केवळ निवडक पत्रकारांना ठरलेले प्रश्न विचारण्याची परवानगी आहे,” असा आरोप त्यांनी केला.