
केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने (EAC) गडचिरोली जिल्ह्यातील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सुरजागड खाणीत लोह खनिज उत्पादन 10 दशलक्ष टन प्रति वर्ष (MTPA) वरून 26 दशलक्ष टन प्रति वर्षापर्यंत वाढवण्याच्या योजनेस पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे 937 हेक्टर वन जमीन खाणकामासाठी वापरली जाणार असून, 1.23 लाख झाडांची कत्तल होणार आहे. हा प्रकल्प नक्षलग्रस्त भागात आहे. या प्रकल्पाबाबत स्थानिक आदिवासी समुदाय आणि पर्यावरणवादी यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकल्पाला स्थानिक आदिवासी समुदायाकडून तीव्र विरोध होत आहे. प्रकल्पामुळे 937 हेक्टर जंगल नष्ट होणार असून, याचा स्थानिक पर्यावरणावर आणि आदिवासींच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय या प्रकल्पामुळे 30 ते 40 गावांतील 50,000 हून अधिक लोक विस्थापित होतील, अशी भीतीही व्यक्ती केली जात आहे.