शेतकऱ्यांनी मोगरा नदीत फेकला, भाव कोसळला.. बळीराजा कोलमडला

पाणीटंचाई असतानाही मोखाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने हंड्याने पाणी आणून कसाबसा मोगरा फुलवला. मात्र अवकाळी पाऊस आणि कल्याण-दादर तसेच नाशिकच्या फुलबाजारात कोसळलेले भाव यामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेला आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला मोगरा नदीत तसेच रस्त्यावर फेकून दिला आहे. उत्पादनाचा खर्च सोडाच पण वाहतुकीचा खर्चही परवडत नसल्याने बळीराजावर ही वेळ आली असून सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मोखाडावासीयांनी केली आहे.

मे महिन्याच्या भीषण पाणीटंचाईत सर्वत्र पाण्याचे स्त्रोत आटले होते. मारुतीचीवाडी येथील धरण गळतीमुळे कोरडे पडले होते, त्याचा फटका मोगरा फुलशेतीला बसला. अनेक शेतकऱ्यांचा मोगरा रणरणत्या उन्हाने, पाण्याअभावी जळून गेला. मात्र काही शेतकऱ्यांनी या कठीण प्रसंगात डोक्यावर हंड्याने पाणी आणून मोगरा पिकाला वाचवले. आपल्या मोगऱ्याला चांगला भाव मिळेल अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना लागली होती. दुचाकीवरून शेतकरी मोगरा कल्याण, दादर आणि नाशिकच्या फुलबाजारात पाठवत आहेत. मोखाड्यात दररोज 8 ते 8 क्विंटल मोगऱ्याचे उत्पादन निघते. पण बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेला मोगरा अक्षरशः पाण्यात तसेच रस्त्यावर फेकून दिला आहे.

कल्याण, दादर आणि नाशिकच्या फुलबाजारात मोगऱ्याला प्रती किलो अवघा 30 ते 40 रुपये इतका कवडीमोल भाव मिळत आहे. शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेलीच परंतु उत्पादन आणि वाहतूक खर्च त्यांच्या हाती येत नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोगरा खोडाळा – वाडा मार्गावर रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

काही शेतकऱ्यांनी मोगरा डोळ्यांत अश्रू आणत गारगई नदीपात्रात फेकून दिला आहे. यापुढे मोगऱ्याचे पीक घ्यायचे की नाही या विचारात मोखाड्यातील मोगरा उत्पादक शेतकरी असून सरकारकडे मदतीची मागणीही केली आहे.

हमी भाव द्या !
टंचाई काळात डोक्यावर पाणी वाहून आम्ही मोगरा जगवला आहे. चांगला भाव मिळेल अशी खूप मोठी आशा होती. मात्र कल्याण, दादर आणि नाशिकच्या बाजारात केवळ 30 ते 40 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी हताश झाले आहेत. मेहनत आणि वाहतुकीचा खर्चही हाती येत नसल्याने मोगरा रस्त्यावर फेकून द्यावा लागला आहे. शासनाने आम्हाला नुकसानभरपाई अथवा हमीभाव द्यावा, अशी आमची मागणी आहे.
पांडुरंग वारे, (मोगरा उत्पादक शेतकरी)