
मुंबईत मुलुंड पश्चिममध्ये एलबीएस रोडवर मेट्रोच्या पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आणखी तीनजण जखमी झालेत. या भीषण दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांचा थरकाप उडाला. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कंत्राटदारावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अखेर या दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.
मुलुंडमध्ये झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी जे काम चाललेलं होतं त्याच्यात स्लॅब कोसळला. या घटनेत दुर्दैवी मृत्युही झालेला आहे. जे जखमी आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एमएमआरडीए आणि राज्य सरकारकडून त्यांची काळजी घेतली जाईल. जी संपूर्ण घटना घडलेली आहे यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही? याची चौकशी केली जाईल. या घटनेला कोण जबाबदार आहे? त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. आणि तात्काळ जिथे-जिथे काम सुरू आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून पुन्हा अशी घटना घडणार नाही, या प्रकारचा प्रयत्न केला जाईल. मृतकांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईत मुलुंडमध्ये मेट्रोच्या पिलरचा काही भाग रिक्षावर कोसळला; एक जण ठार तर तीन जण जखमी





























































