Nagar News : जिल्हा मागणीसाठी ‘श्रीरामपूर’मध्ये कडकडीत बंद, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या मागणीसाठी आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. श्रीरामपूरमधील व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून श्रीरामपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असून त्याचं क्षेत्रफळ 17412 चौ. किमी आहे. हा जिल्हा तसा दोन भागांत विभागला आहे, उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा. गोवा राज्यापेक्षा पाचपट क्षेत्रफळ नगर जिल्ह्याचे आहे. त्याच्या विभाजनाची मागणी गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे. यासाठी अनेक आंदोलने, निवेदने आणि सह्यांची मोहीम घेऊन आंदोलने प्रभावीपणे राबविण्यात आली. परंतु शासनाने या मागणीकडे वारंवार कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. त्यास श्रीरामपूर येथील नागरिकांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. तसेच श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनता सहभाग नोंदवत बंद यशस्वी केला. उत्तर नगर जिल्ह्यात अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे हे तालुके येतात. या सर्व तालुक्यांमध्ये प्रामुख्याने भौगोलिकदृष्ट्या श्रीरामपूर तालुका मधोमध येतो. त्यामुळे राज्य सरकार या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.