
नांदेड जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरूच आहे. शुक्रवारी मुखेड तालुक्यात मुक्रमाबाद येथील भवानी तांडा येथे 35 शेळ्या वाहून गेल्या. यामुळे शेतकरी जयराम धनाजी पवार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाचच्या सुमारास पवार यांची लहान मुलगी शिवारात शेळ्या चारून परत घराकडं येत होती. परतीच्या वाटेवर जोरदार पावसामुळे ओढ्याला अचानक पूर आला. पूर ओलांडताना संपूर्ण कळप पाण्यात अडकला आणि काही क्षणांतच 35 शेळ्या वाहून गेल्या. यापैकी 2 शेळ्या मृत अवस्थेत आढळून आल्या, तर उर्वरित अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राजेश जाधव यांनी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याचे आदेश दिले, त्यानुसार पंचनामे करण्यात आले.
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनेची पाहणी करून पंचनामा केला आहे. पवार कुटुंबाला शासनाकडून शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
Hingoli rain – इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जयराम पवार यांचा शेळीपालन व्यवसाय हा त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. या दुर्दैवी घटनेने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.