लग्नसमारंभाहून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत कारमधील 9 जण ठार

लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाने झडप घातली. भरधाव ट्रकला कारची जोरदार धडक झाली आणि यात कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचाही चक्काचूर झाला. कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकही अनियंत्रित झाला आणि जवळच्या शेतात उलटला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

पश्चिम बंगालमधील पुरुलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग 18 वर ही घटना घडली. झारखंडमधील 9 जण लग्नसमारंभासाठी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. लग्न समारंभ आटोपून सर्वजण आपल्या गावी परतत होते. यादरम्यान पुरुलिया-जमशेदपूर राष्ट्रीय महामार्ग 18 वरील बलरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला कारने धडक दिली.

कारला वाचवण्याच्या नादात ट्रकही अनियंत्रित होऊन उलटला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.