
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-मनसे शिवशक्तीचा कर्तव्यनामा बुधवारी जाहीर करण्यात आला. शहराचा विकास सध्या ठेकेदारांच्या सल्ल्यानुसार आणि अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मर्जीनुसार होत आहे. मात्र यापुढे कोणतीही विकासकामे करताना प्रत्येक वॉर्डमध्ये सर्वसामान्य नागरिकांची वॉर्डसभा घेऊन त्यांना पसंत असलेली कामेच केली जाणार आहेत. पुनर्विकासात राजकीय दलालांच्या टोळ्यांनी घुसखोरी करून सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले आहे. या दलालांनाही चाप लावण्याचे काम करण्यात येणार आहे. आरोग्य सेवेचे बजेट २३० कोटींवरून ५०० कोटींपर्यंत वाढून आरोग्य सेवा मोफत देण्यात येणार आहे. ही केवळ आश्वासने नसून ठाकरेंचा शब्द आहे आणि हा दिलेला शब्द कर्तव्य म्हणून पाळला जाणार असल्याची ग्वाही शिवसेना आणि मनसेच्या वतीने देण्यात आली.
वाशी येथील मर्चेंट जिमखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात शिवसेना-मनसे शिवशक्तीचा कर्तव्यनामा आज जाहीर करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विधानसभा प्रमुख अतुल कुळकर्णी, मनसेचे विक्रांत माने, विलास घोणे आदी उपस्थित होते.
नवी मुंबई शहर हे सुनियोजित असले तरी महापालिकेची आरोग्य सेवा ही दुबळी आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना आरोग्य सेवेसाठी मुंबईवर अवलंबून राहावे लागते. मात्र शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आरोग्य सेवेचे बजेट दुपटीने वाढविण्यात येणार आहे. बंद असलेली सर्वच रुग्णालये तातडीने सुरू केली जाणार आहेत. ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. मात्र त्यातील एक टक्का पर्यटकही नवी मुंबईत येत नाही. त्यामुळे नवी मुंबई जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ निर्माण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा १११ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारला जाणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन, जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्ययन केंद्र व संत महात्म्यांचे तैल चित्र दालन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उद्यान व प्राणी संग्रहालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा केंद्र, सरखेल कान्होजी आंग्रे शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वतंत्र कन्या अभ्यासिका, डॉ. आनंदीबाई जोशी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी, एपीजे अब्दुल कलाम बोटॅ निकल गार्डन, खाशाबा जाधव तालीम, द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल आदी वास्तूही शहरात उभारण्यात येणार आहेत.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे योगदान नवी मुंबई शहरासाठी फार मोठे आहे. मात्र येथील सत्ताधाऱ्यांना त्यांचा विसर पडला आहे. ते फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा वापर करतात. शिवसेना आणि मनसेच्या वतीने दिबांचा पूर्णाकृती पुतळा महापालिका मुख्यालयासमोर उभा करण्यात येणार आहे. नवी मुंबई विनामतळाला दिबांचे नाव अद्याप लागले नाही. मात्र या विमानतळाकडे जाणाऱ्या प्रत्येकाला दिबांचे दर्शन घेऊनच पुढे जावे लागणार आहे.
































































