
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र याकडे केंद्र आणि राज्य सरकराचं लक्ष नाही. अशातच सरकारने त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही मागणी केली आहे.
X वर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून ना केंद्र सरकार याकडे लक्ष द्यायला तयार आहे, ना राज्य सरकार. अशात शेतकऱ्यांनी कोणाकडे भाव मागायचा? की मातीमोल भावाने कांदा विकायचा?”
रोहित पवार म्हणाले, “मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली असली तरी, सरकारचे निर्यातीचे नियोजन नसल्याने तसेच उदासीन धोरण असल्यानेच कांद्याचे दर पडले आहेत. कांद्याला सद्याला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्याची मोठी पिळवणूक होत आहे.” ते म्हणाले, “तरी सरकारने त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. तसेच कांदा चाळ अनुदान, ठिबक अनुदान मिळत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे अनुदानात वाढ करावी आणि कांदा चाळ योजना प्रभावीपणे राबवावी.”