मंत्र्यांचे स्वागत करायले गेले अन् पाय घसरून पडले! पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या शेजारील देश म्हणून पाकिस्तानची ओळख ही जगभरात ज्ञात आहे. पाकिस्तान हिंदुस्थानबाबत करत असणारी दहशतवादी कृत्ये जगभरात कुप्रसिद्ध आहे. नुकत्याच एका ताज्या घटनेमुळे सध्या पाकिस्तानचे सोशल मीडियावर हसे झालेले आहे. पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक दार हे इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्याचे स्वागत करताना अडखळून जमिनीवर पडले. त्यांचा हा व्हिडीओ आता समोर आला असून, पाकिस्तानची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक दार इजिप्तच्या नेत्याच्या दिशेने जाताना दिसत आहेत, पण त्यांचा तोल जातो आणि ते पडतात. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी त्यांना उचलतात.

मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबियासोबत दोन दिवसीय चर्चा सुरू आहे. या चर्चेचा उद्देश इराण युद्धावर शांतता प्रस्थापित करणे हा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या चर्चांचा उद्देश इराणमधील युद्धात शांतता प्रस्थापित करणे हा असला तरी, त्यातील दोन प्रमुख घटक, अमेरिका आणि इस्रायल, यात सहभागी नाहीत.

रविवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका औपचारिक कार्यक्रमादरम्यान इजिप्तचे परराष्ट्रमंत्री बद्र अब्देलती यांचे स्वागत करत असताना, पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक दार यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ सावरले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

या चर्चेदरम्यान पाकिस्तानने पडद्यामागून हालचाली सुरू केल्या असून अमेरिकेचा 15 कलमी प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचवला आहे. जरी अमेरिका आणि इराण या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी नसले, तरी ही चर्चा भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला असून, प्रादेशिक शांततेसाठी इतर देशांनाही विश्वासात घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

इराणने अमेरिकेच्या प्रस्तावांवर अविश्वास दाखवला असून अमेरिकेच्या मागण्या अवाजवी असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, अमेरिकेने इराणच्या अणू कार्यक्रमावर आणि प्रादेशिक भूमिकेवर काही अटी घातल्या आहेत. दोन्ही देश आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने, ही चर्चा यशस्वी होऊन तणाव कमी होणार का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.