
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर निर्णय घेत सिंधू जल करार रद्द करत पाकिस्तानचे पाणी अडवले आहे. त्यानंतर पायाखालची जमीन सरकलेल्या पाकड्यांनी दर्पोक्ती करत सिंधू नदीचे पाणी वाहिल किंवा रक्ताचे पाट वाहतील, असे फुत्कारही सोडले होते. मात्र, हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांना पळता भुई थोडी झाली. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वतःची आणि देशाची हतबलता व्यक्त केली आहे. मात्र, आता हिंदुस्थानने पाणी अडवल्यामुळे पाकड्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंधू जला कराराचे रडगाणे सुरू केले आहे.
हिंदुस्थानच्या दणक्याने खरीप हंगामापूर्वी पाकिस्तानमध्ये जलसंकट अधिक गडद झाले आहे. मंगला आणि तुर्बेला या दोन मोठ्या धरणांमध्ये पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जगासमोर सिंधू पाणी कराराचे रडगाणे सुरू केले आहे. या जलसंकटामुळे शाहबाज सरकार आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची झोप उडाली आहे.
पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाच्या (IRSA) ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की सध्या देशात एकूण 21% पाण्याची कमतरता नोंदली गेली आहे. मंगला आणि तुर्बेला धरण या दोन प्रमुख जलाशयांमध्ये फक्त अर्धा पाणीसाठा शिल्लक आहे. झेलम नदीवर मंगला धरण बांधले आहे. त्याची एकूण क्षमता 5.9 दशलक्ष एकर फूट (एमएएफ) आहे, परंतु त्यात फक्त 2.7 एमएएफ पाणी शिल्लक आहे. त्याच वेळी, सिंधू नदीवर बांधलेल्या तुर्बेला धरणात फक्त 6 एमएएफ पाणी शिल्लक आहे, तर त्याची क्षमता 11.6 एमएएफ आहे.
हिंदुस्थानने सिंधू पाणी करार रदद करत पाकिस्तानसोबत पाण्याच्या प्रवाहाशी संबंधित कोणताही डेटा शेअर करणे थांबवले आहे, ज्यामुळे पाकिस्तानी प्रशासन आणि सैन्याला येत्या पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागू शकतो. पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतातील संपूर्ण सिंचन व्यवस्था सिंधू नदी प्रणालीवर आधारित आहे, ज्याला झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांमधून पाणी मिळते. हिंदुस्थानकडून चिनाबमध्ये अचानक पाणीपुरवठा कमी झाल्याने पाकिस्तानच्या कृषी व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्याचा थेट परिणाम मे ते सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या खरीप हंगामाच्या पेरणीवर झाला आहे.
आयआरएसएने इशारा दिला आहे की जर परिस्थिती सुधारली नाही तर लवकरच पाण्याचे संकट अधिक तीव्र होईल. पाकिस्तानी संस्थांना जलाशयांमधून अतिशय काळजीपूर्वक पाणी सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयआरएसएने म्हटले आहे की मार्च ते सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला तीव्र पाण्याची कमतरता भासू शकते. चिनाब नदीवरील हिंदुस्थानच्या पाणीप्रवाह धोरणात बदल झाल्यामुळे, मराला हेडवर्क्स येथे पाण्याच्या प्रवाहात झपाट्याने घट झाली आहे, ज्याचा पंजाब आणि सिंध प्रांतांच्या सिंचन व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य पाहून, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही ताजिकिस्तानमध्ये झालेल्या हिमनदी संवर्धन परिषदेत याबाबत चिंता व्यक्त केली. मात्र, हिंदुस्थानच्या निर्णयावारच पाकिस्तानला पाणी मिळणार किंवा नाही, हे ठरणार आहे. हिंदुस्थानने आता चिनाबवर बांधलेले बगलिहार आणि सलाल धरणे स्वच्छ करून पाणीसाठा वाढवला आहे आणि गरजेनुसार पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच पाकिस्तानची पाणी समस्या गंभीर होत आहे.
पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरून हे स्पष्ट होते की आता शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पाण्यासाठी त्यांना जगासमोर सिंधू जल कराराचे रडगाणे गावे लागत आहे. आता या दणक्यानंतर पाकिस्तान आपल्या दहशतवाद्यांना पोसण्याचे धोरण सोडणार का, अशी चर्चा होत आहे.