
राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेला दिंड्या अन् पालख्यांचा सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर विसावला असून पंढरी नगरी वारकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेलीय. चंद्रभागा नदीचे स्नान करुन भाविक श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. देवाची दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहचलीय, एका मिनिटांमध्ये तीस भाविकांना पदस्पर्श दिले जात असल्याने दिवसभरात चाळीस हजार भाविकांना पद दर्शन आणि साठ हजार भाविकांना मुख दर्शन असा एक लाख भाविकांना लाभ मिळतो आहे.
आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने, पंढरपूर मध्ये वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. मठ, धर्मशाळा, भक्त निवास आणि हॉटेल हाऊसफुल्ल झाली आहेत. शहरातील मोकळी मैदाने, भक्ती सागर, वाळवंट आदी परिसरात भाविकांनी आपल्या मुक्कामाची सोय केलीय. शिवाय शासनाच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये तात्पुरते शेड उभे करुन वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना मूलभूत सेवा सुविधांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरीत तळ ठोकून आहेत.
गेल्या महिनाभरापासून वारीचे नियोजन सुरू आहे. स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य, निवारा, कायदा सुव्यवस्था, शौचालये, रस्ते, दर्शन व्यवस्था, स्नान व्यवस्था आदींवर अधिक भर देण्यात आलाय. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील वारीच्या नियोजनासाठी पाचहून अधिक बैठका घेऊन वारीच्या नियोजनात कुचराई करू नका दिलेले जबाबदारी गांभीर्याने पार पाडा अशा सक्त सूचना दिल्या आहेत. पालखी सोहळ्यातील गर्दी पाहता यावेळी वारी विक्रमी भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.