पोलीस डायरी – लोक बरबाद होत आहेत, देश लुटला जात आहे

>> प्रभाकर पवार

एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटकेची भीती दाखवून 6 कोटी रुपये उकळणाऱ्या तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय 28. राहणार कोकबेन, ता. रोहा, जि. रायगड) या खंडणी बहाद्दरला पुणे पोलिसांच्या सायबर सेलने गेल्या आठवड्यात अटक केली. तुषार वाजंत्री हा एका सरपंच महिलेचा पती असून खंडणीचे काही कोटी रुपये त्याने आपल्या बँक खात्यात जमा केले होते. सीबीआय किंवा पोलीस असल्याचे भासवून तुषार वाजंत्रीने देशभरात अर्धा डहान नागरिकांना फसविले असल्याचे तपासात उघड झाले आहे. खंडणीच्या पैशातून तुषार वाजंत्रीने आपल्या गावात बरीच जमीन विकत घेतली आहे. परंतु तुषार वाजंत्रीसारखे असे भामटे आज गावागावांत, शहराशहरांत असून परदेशातून खंडणीसाठी धमकावणाऱ्या सायबर माफियांना ‘बँक’ खाते उपलब्ध करून देण्याचे काम तुषारसारखे भामटे करीत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करीत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडे कोणतीच ठोस उपाययोजना नाही मिशन डिजिटल इंडियाचा आपल्या देशात पूर्णपणे फज्जा उडालेला आहे.

आपल्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल येतो तेव्हा कॉल करणाऱ्या सायबर भामट्याच्या पाठीमागे पोलीस किंवा सीबीआय कार्यालय असल्याच्या प्रतिमा दिसतात. फोन करणारा भामटा बऱ्याचदा खाकी वर्दीत असतो. आपल्याविरुद्ध अटकेचे वॉरंट आहे. आपण गुन्हेगार आहात. आपणास डिजिटल अटक करण्यात आली आहे. तुम्ही ड्रग्जच्या तस्करीत गुंतलेले आहात किंवा आपल्या आधारकार्डाचा गैरवापर झाला आहे. आता आपली या प्रकरणातून सुटका नाही. आपल्याविरुद्धची कारवाई जर थांबवायची असेल तर आम्ही सांगतो त्याप्रमाणे करा आम्ही दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा करा. ‘आरटीजीएस’ करा असे न केल्यास तुम्हाला परिणाम भोगावे लागतील. सायबर भामट्यांच्या या व अशा धमक्यांनंतर बहुसंख्य स्त्री-पुरुष घाबरतात. घरातील कुणाला न सांगता आपल्या बँक खात्यातील पैसे सायबर माफियांनी नमूद केलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. वारंवारच्या धमक्यांना घाबरून आपल्या बैंक ‘एफडी’ मोडतात. घरात असलेले सारे दागिनेही विकतात. बँक खात्यात, घरात काहीच शिल्लक राहत नाही तेव्हा फसलेले स्त्री-पुरुष पोलिसांकडे धाव घेतात. तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे ही पण एकप्रकारे जोखीमच असते. परंतु चांगला परतावा मिळाल्यास आपण झटपट श्रीमंत होऊ असा विचार करून अनेकजण ज्या अस्तित्वातच नाहीत अशा आभासी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. अनोळखी व्हॉटसअ‍ॅप समूहामध्ये सामील होतात आणि करोडो रुपये गमावून बसतात. सायबर माफियांनी आपल्याच गँगच्या सभासदांची शेअर ट्रेडिंग अ‍ॅप तयार करून व्यावसायिकांची अलीकडे फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यात बरेच उच्चशिक्षित फसत आहेत. पैशाच्या मोहापायी भरघोस परतावा देणारी कंपनी खरी की खोटी हे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कुणीही गुंतवणूकदार खात्री करून घेत नाही. त्यामुळे आज सायबर माफियांकडून रोज आपल्या देशातून करोडो रुपये लुटले जात आहेत.

भारतीय स्त्री-पुरुषांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना देशोधडीला लावणारे सायबर माफिया परदेशी आहेत सायबर माफियांनी चीन, म्यानमार, कंबोडिया, दुबई, स्वित्झर्लंडमधील दावोस आदी देशांत कॉल सेंटर उभारली आहेत. त्यात बहुसंख्य भारतीय तरुणांची भरती करण्यात आलेली आहे. नोकरी शोधत असलेल्या (Job seekar) भारतीय तरुणांची दिशाभूल करून त्यांना कॉल सेंटरमध्ये बसविले जाते. हीच तरुण पोरं भारतीयांना फोन करतात आणि करोडो रुपयांना गंडा घालतात. हा गुन्हा आहे. आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यावर भारतीय तरुण मुलं पुन्हा भारतात परतण्याचा प्रयत्न करतात तेव्हा परदेशी सायबर माफिया त्या तरुणांचे पासपोर्ट काढून घेतात. कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करतात. अलीकडेच म्यानमारमधील कॉल सेंटरमध्ये अडकलेल्या 600 भारतीय तरुणांची मुंबई क्राईम बॅचच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली. त्यात महाराष्ट्रातील 30 तरुणांचा समावेश होता. याप्रकरणी वर्तमानपत्रातील फसव्या जाहिराती पाहून तरुणांना परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या दोन एजंटनाही अटक करण्यात आली होती. तेव्हा नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनो सावधान. वर्तमानपत्रातील जाहिराती व एजंटवर विश्वास ठेवू नका. परदेशी नोकरीच्या मोहात पडू नका सायबर माफिया म्हणून एकदा तुमच्यावर शिक्का बसला तर तुम्ही आयुष्यातून उठाल, फसल्या गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांची ‘हाय’ लागेल. अलीकडेच वांद्रे बीकेसी परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने ऑनलाइन माफियांच्या भुलथापांना बळी पडून सहा महिन्यांत 26 कोटी रुपये गमावले. त्या महिलेला आता वेड लागले आहे. काही वृद्ध महिला कोमात गेल्या आहेत, तर काहींनी हे राम’ बोलून हे जग सोडले आहे. मध्यंतरी डिजिटल अटकेची भीती दाखवून मुंबईतील काही तरुणींना आपल्या अंगावरील कपडे काढावयास भाग पाडण्यात आले होते. त्यात एक तरुणी वकील होती. या साऱ्या महिला अजूनही सावरलेल्या, नॉर्मल झालेल्या नाहीत. राज्यकर्त्यांनो, आपण याचा गांभीर्याने विचार करावा, नाही तर सारा देश देशोधडीला लागेल.

आपल्या देशवासीयांना जास्तीत जास्त लुटण्याचे काम चीन करीत आहे. याला आळा घालावयाचा असेल तर सायबर सेल व कर्मचारी वाढविले पाहिजेत. जनजागृती केली पाहिजे. गोल्डन अवर मध्ये 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यावर फसल्या गेलेल्या अनेकांना आपले पैसे परत मिळाले आहेत, परंतु फसणाऱ्यांची संख्या 95 टक्के पेक्षा अधिक आहे. तर ‘जन हो सावधान’ सायबर माफियांच्या जाळ्यात अडकल्यास तत्काळ 1930 या हेल्प लाइनला संपर्क साधा.