
संसदेत विरोधी पक्षनेत्यांना बोलू न दिल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “यात नवीन काहीच नाही. प्रत्येक अधिवेशनात असेच घडते. आता तर हे आणखी वाढले आहे,” असे त्यांनी सांगितले.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, हा विषय केवळ लोकसभेतील विरोधी पक्षनेते (LoP) राहुल गांधी यांना बोलू न दिल्यापुरता मर्यादित नाही, तर तो संसदेच्या कार्यपद्धतीचा आणि लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारा आहे. “संसद ही लोकशाहीचे मंदिर आहे. कोणी आपले मत मांडले तर त्यात अडचण काय आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
#WATCH | On suspension of 8 Opposition MPs, Congress MP Priyanka Gandhi Vadra says, “What is new here? You see this happening in every session. They are doing it even more now…It is not just a case of LoP not being allowed to speak; it is a fundamental issue of democracy and of… pic.twitter.com/bxVUPWEbIg
— ANI (@ANI) February 4, 2026
सरकार टीकेला घाबरत असल्याचा आरोप करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, “जे मुद्दे बाहेर येऊ शकतात, त्याची भीती सरकारला आहे. म्हणूनच संबंधित पुस्तकाचे प्रकाशनही रोखण्यात आले.” त्यांच्या मते, त्या पुस्तकात संकटाच्या काळात पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि देशातील सर्वोच्च नेतृत्वाची भूमिका काय होती, याचा उल्लेख आहे. “देशावर हल्ला होत असताना आणि चीनचे सैनिक सीमारेषेवर येत असताना सरकारची प्रतिक्रिया कशी होती, हे त्या पुस्तकातून समोर येते. यातून सरकारचा आणि नेतृत्वाचा स्वभाव स्पष्ट होतो,” असे त्यांनी सांगितले.
प्रियंका गांधी यांनी ‘एपस्टीन फाइल्स’चाही उल्लेख केला. “एपस्टीन फाइल्स प्रसिद्ध झाल्या असून, त्यामध्ये सरकारचा संपर्क एका दोषी लैंगिक गुन्हेगाराशी कसा होता, याचा उल्लेख आहे. तो व्यक्ती बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात दोषी ठरलेला आहे. मग त्याचा वापर कसा करण्यात आला, हा प्रश्न उपस्थित होतो. हे सर्व अधिकृत आणि प्रमाणित दस्तऐवज आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर संसदेत चर्चा कशावर होणार, असा सवाल करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, “जर अशा मुद्द्यांवर चर्चा होणार नसेल, तर संसदेत नेमकी चर्चा कशावर करायची?”
राहुल गांधी यांनी मांडलेले मुद्दे प्रकाशित स्रोतांवर आधारित असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, “राहुल गांधी हे कुठलीही अफवा सांगत नाहीत. त्यांनी ज्या गोष्टी उद्धृत केल्या आहेत, त्या प्रकाशित आणि प्रमाणित स्रोतांमधून आहेत. कालच त्यांनी त्याचे प्रमाणीकरणही केले.”
सत्ताधारी एनडीएवर टीका करत प्रियंका गांधी म्हणाल्या की, “सत्ताधारी पक्षाचे नेतेही भाषण करताना पुस्तकांचे, मासिकांचे संदर्भ देतात. मग राहुल गांधी तसे करतात, तर अडचण काय आहे? एखादी गोष्ट प्रकाशित स्रोतावर आधारित असेल, तर ती मांडण्यात गैर काय आहे?” एकूणच संसदेत चर्चेला अडथळे आणले जात असून, ही बाब लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केले.



























































