मानाच्या गणपतींपाठोपाठ यंदा भाऊसाहेब रंगारी, मंडई मंडळ; गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत संपविण्यासाठी निर्णय

वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणारे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दोन्ही मंडळे मानाच्या पाचव्या गणपती पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर ही मंडळे त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होतील. विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, विश्वास भोर आदी उपस्थित होते.

अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून, संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्त्व आहे. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे विसर्जन, यावर्षी अनंत चतुदर्शी (दि.6 सप्टेंबर) च्या दुसऱ्या दिवशी (दि. 7) खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी 12 पूर्वी मंडळांच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षे पोलिसांनी दिलेल्या वेळेस 7 वा. ‘श्रीं’ची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असतो; पण गेली काही वर्षे पोलीस प्रशासनाने शब्द पाळला नाही. त्यामुळे सायंकाळी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की, यंदा मिरवणूक रविवारी दुपारी 12 पूर्वी संपवावी.

यावेळी बोलताना पुनीत बालन म्हणाले, ग्रहणकाळ असल्यामुळे मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून, आम्ही मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्व गणेशमंडळांनीदेखील याबाबत सहकार्य केल्यास पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.