
इंडियन प्रीमियर लीगचा धुमधडाका 28 मार्चपासून सुरू होत आहे. वर्ल्डकपनंतर जगभरातील क्रिकेटपटूंना एकत्र आणणाऱ्या या महाकुंभाकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडण्यासाठी आणि विकेटचा रतिब घालण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये सर्वांचे लक्ष 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याच्याकडे असणार आहे. गेल्या हंगामात त्याने आपल्या बॅटचा तडाखा विरोधी संघांना दिला होता आणि आताही तो गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. राजस्थान रॉयल्सचा तो हुकुमाचा एक्का असणार आहे. वैभव सूर्यवंशी जर पूर्ण लयीत खेळला तर राजस्थानला हरवणे कठीण होईल, असे मत टीम इंडियाचा माजी खेळाडू आर. अश्विन याने व्यक्त केले आहे.
वैभव सूर्यवंशीने नुकत्याच झिम्बाब्वेमध्ये झालेल्या एकोणीस वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानसाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. तसेच आयपीएलच्या गेल्या हंगामात संजू सॅमसन दुखापतग्रस्त असताना वैभवला संधी मिळाली होती आणि त्याने त्याचे सोने केले. यंदाच्या हंगामात त्याची कामगिरी कशी राहील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना अश्विनने मोठे विधान केले.
जर वैभव सूर्यवंशी या हंगामात मोठा फॅक्टर ठरला, तर राजस्थान रॉयल्सला कोणीही रोखू शकणार नाही. पण क्रिकेटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, हा त्याचा दुसरा हंगाम आहे. तो अजून लहान आहे, अननुभवी आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त दडपण टाकू नये. सोशल मीडिया आणि मीडियामध्ये खूप चर्चा होईल, पण त्याने आपल्या नैसर्गिक शैलीत खेळावे, असे अश्विन म्हणाला. तसेच मला त्याला पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळताना पाहायचे आहे. पण यावेळी इतर संघ त्याच्याविरुद्ध खास रणनीती आखतील, हे त्याने विसरता कामा नये, असेही तो पुढे म्हणाला.
Fact Check – विराट कोहली याने लंडनहून येण्या-जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाईटची मागणी केली?
गेल्या हंगामामध्ये वैभव सूर्यवंशी याने 7 डावात फलंदाजी करताना 252 धावा चोपल्या होत्या. 206.55 चा जबरदस्त स्ट्राईकरेट आणि 36 च्या सरासरीने त्याने ही धावांची लयलूट केली होती. गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.























































